- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि आपण कोणाच्या भरवशावर एवढे मोठे झालोत,हे सर्वकाही विसरून जात असल्याने अनेकजण सर्वकाही गमावून बसतात.अश्याच प्रकारे ग्रामपंचायतीतील एका सरपंचाने ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता तसेच कुठल्याही प्रकारचा ठराव न घेता ग्रामपंचायतीच्या मालकी जागेतील बाभूळ व निलगिरीची तब्बल १२० झाडे तोडून परस्पर विक्री केल्याने नागपूरच्या अप्पर आयुक्तांनी ग्रामपंचायत अधिनियम ३९(१)अंतर्गत पदाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी सरपंचास अपात्र ठरवले आहे.भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील मालची(पुनर्वसन) ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र गजभिये असे अपात्र ठरविण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,पवनी तालुक्याच्या मालची गावाचे कोंढा(कोसरा)-बेलाटी मार्गावर कोंढा गावालगत पुनर्वसन झाले आहे.येथे शासनाने सर्व सुविधा गावकऱ्यांना दिल्या.मोकळ्या जागेत ग्रामपंचायत इमारत तसेच समोरील जागेत वृक्षारोपण करून झाडे लावण्यात आली होती.या शासकीय जागेतील झाडांची अवैधरित्या वृक्षतोड झाल्याची लेखी तक्रार ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर तलमले व ग्रामपंचायत सदस्य यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली होती.सरपंच गजभिये यांनी ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही प्रकारच्या ठराव तसेच गावकरी व सदस्यांना विश्वासात न घेता १२० झाडांची अवैध कत्तल करून परस्पर शंभू नंदागवळी यांना १ लाख रुपयात विकले.प्रकरणी चौकशी करून सरपंच गजभिये यांना आपली बाजू मांडण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलाविले.परंतु त्यांनी आपले म्हणणे सादर केले नाही.तथापि,मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदरचे प्रकरण अप्पर आयुक्त नागपूर यांचेकडे प्रकरण सादर केले होते.या प्रकरणाची अंतिम सुनावणी अप्पर आयुक्त नागपूर यांनी घेऊन गैरअर्जदारास लेखी म्हणणे सादर करण्याची संधी दिली. परंतु त्यांनी बचावात्मक सबळ पुरावे सादर केले नाही. महेंद्र गजभिये यांनी शंभू नंदागवळी यांना ४ लाख २० हजार रुपये किंमतीची झाडे एक लाख रुपये किंमतीत विक्री करून अवैधरित्या तोडून नेल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सरपंचास आपले पद गमवावे लागले.
- Advertisement -

