- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले.आंबेडकर यांच्या निधनाची बातमी संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांच्या काळजाचा ठेका चुकला होता.अनेकांना बाबासाहेब आपल्याला सोडून गेलेत,असा विश्वासच बसेनासा झाला होता.अशातच आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाची हृदय हेलावणारी बातमी रिक्षावर शहरभर फिरून रडत-रडत सांगणारे ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते दामू मोरे उर्फ दामूदा शिवाजी मोरे यांचे काल सोमवारी ९२ व्या वर्षी निधन झाले.त्यांनी मृत्यूपूर्वी केलेल्या संकल्पानुसार त्यांचे मेडिकलला देहदान करण्यात आले.दामू मोरे यांचा जन्म एका आंबेडकरी कुटुंबात झाला.साउंड सर्व्हिसचा (डेकोरेशन) त्यांच्या घरगुती व्यवसाय होता.मोरे साऊंड सर्व्हिस तेव्हा चांगलेच प्रसिद्ध होते.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा दामू हे केवळ १२ वर्षांचे होते.त्या दिवशी दुकानात असतांना बातमी मिळाली ‘बाबासाहेब गेले’. घरातील मोठ्यांनी स्वतःचा शोक बाजूला ठेवून,ही बातमी जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लहानग्या दामूवर सोपविली होती.त्या दिवशी नागपूरच्या गल्लीबोळांमध्ये एका रिक्षातून फिरणारा हा छोटा मुलगा,हातात माईक घेऊन,संपूर्ण देशाच्या भावनांवर घाला घालणारी बातमी सांगत होता.लोकांच्या डोळ्यांत पाणी आले,काहींनी विश्वास न बसून त्याच्यावर ओरड केली,काहींनी बातमी खोटी निघाल्यास जिवंत गाडण्याची धमकीही दिली.काहींनी रागाने धाव घेतली; पण त्या आवाजामागे फक्त एक पोरगं नव्हतं,तर एक जबाबदारी होती,एक सत्य होतं आणि एक असीम वेदना होती.दामू मोरे ही आठवण नेहमी सांगायचे.त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांनी काल सोमवारी मेडिकलमध्ये त्यांचे देहदान केले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक,मुलगा व मोठा आप्त परिवार आहे.
- Advertisement -

