उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- देशात सध्या मोबाइल नंबर मिळण्याची समस्या निर्माण झाली आहे.बहुतेक मोबाइल वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनमध्ये दोन सिम कार्ड वापरतात.यामध्ये एक कार्ड चालू असते तर दुसऱ्याचा वापर खूपच मर्यादित होतो किंवा ते बंद राहते.तसेच काही वापरकर्ते एकापेक्षा जास्त मोबाइल सिम कार्ड वापरतात.त्यामुळे बंद असलेल्या मोबाइल क्रमांकावर शुल्क वसूल करण्याची योजना आखण्यात आली आहे.हे शुल्क एकरकमी किंवा वार्षिक आधारावर घेतले जाऊ शकते.ट्रायने मोबाइल फोन किंवा लैंडलाइन नंबरसाठी मोबाइल ऑपरेटर्सकडून शुल्क आकारण्याची योजना तयार केली आहे.त्यामुळे कंपन्या हे शुल्क वापरकर्त्यांकडून वसूल करू शकतात.मोबाइल ऑपरेटर त्यांचा वापरकर्ता सोडून जाईल या भीतीमुळे बऱ्याच काळापासून बंद असलेली सिम कार्ड बंद करत नाहीत.नियमांनुसार सिम कार्ड दीर्घकाळ रिचार्ज न केल्यास ते काळ्या यादीत टाकण्याची तरतूद आहे.
आकडेवारीनुसार,सध्या २१.९१ कोटींहून अधिक मोबाइल नंबर काळ्या यादीत समाविष्ट आहेत; जे बऱ्याच काळापासून सक्रिय नाहीत.एकूण मोबाइल क्रमांकांपैकी हे प्रमाण सुमारे १९ टक्के आहे.सरकार स्वतः मोबाइल ऑपरेटरला मोबाइल नंबर सिरीज जारी करते.मोबाइल क्रमांक मर्यादित संख्येत उपलब्ध असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे.अशा परिस्थितीत सिम कार्डचा योग्य वापर करणे गरजेचे झाले आहे.

