उद्रेक न्युज वृत्त
कुरुड(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कुरुड-वैनगंगा नदिघाटातून मागील गेल्या बऱ्याच महिन्यांपासून तसेच हल्ली मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेतीचा उपसा केला जातो आहे.अशातच रेती चोरट्यांवर कुणाचाही वचपा नसल्याने चोरट्यांनी दोन रेती घाटांबरोबरच नवीन तिसऱ्या रेती घाटाचा शोध लावून सर्वांकडून ‘माल सुतावो’ अशी भूमिका घेतली जात आहे.अशातच आठवड्यातील दर रविवारला सर्वांच्या हिश्याची रक्कम वाटप केली जात असल्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू असल्याने “रेतीचा अवैध उपसा अन् मिळणारी रक्कम खिशात खूपसा” असे चित्र निर्माण झाले असल्याने यावर आळा घालणार कोण? यासाठी गावात सक्षम तलाठ्याच्या नियुक्तीची मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.
मागील काही महिन्यांपासून तर सध्याच्या घडीला रेती तस्करांनी रेती घाटातून लाखो रुपयांच्या रेतीचा अवैध उपसा करून शासनाच्या महसुलाची राखरांगोळी केलेली दिसून येत आहे.रेती तस्करांनी शक्कल लढवून बोडेगाव रेती घाटा सोबतच वाघढोडा म्हणवल्या जाणाऱ्या अवैध रेतीचा उपसा करण्याकरीता नवीन मार्ग शोधला आहे.जेणेकरून कुणालाही भनक लागू नये; यासाठी रेती तस्करांनी शक्कल लढवून नवीन मार्गाचा वापर केला आहे.
रेतीचा अवैध उपसा करण्याकरिता रेती तस्करांनी कुरुड गावातील पाटील मोहल्ला,विठ्ठल रुकमाई मंदिर,तळ्याची गल्ली व नहराच्या मार्गाचा गावापासून ते नदी घाटा पर्यंत २ किलोमीटर अंतराचा वापर केला आहे.गावापासून बोडेगाव वैनगंगा नदी घाट २ किलोमीटर अंतरावर असून बोडेगाव वैनगंगा नदी घाटाकडे जाणाऱ्या मार्गा पूर्वीच डावीकडे नहराच्या मार्गाने तसेच बोडेगाव नदी घाट पूर्वी डाव्या बाजूने तयार करण्यात येणाऱ्या नवीन मार्गाने अडीच किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या वळणावर उजवीकडे शेतकऱ्यांच्या मोठ्या धूऱ्यांच्या बांधांचे खोदकाम करून सरळ नवीन रेती घाटाचा रस्ता तयार करून अवैध रेती उत्खनन केली जात आहे.हल्ली रेतीचे भाव वधारले असल्याने रेती तस्करांची चांदीच-चांदी पहावयास मिळत आहे.गावात तलाठी वास्तव्यास राहत नसल्याने रेती तस्कर याच संधीचे सोने करवून घेतांना दिसून येत आहेत.पूर्वीच लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडूनही कुणाला ‘ना सुतक ना बारसा’असे दिसून येत आहे.अवैध रेतीच्या उपस्यावर आळा घालण्यास गावातील तलाठी सक्षम नसल्याचे संबंधित प्रकारावरून दिसून येत असल्याने सक्षम तलाठ्याची गावात मागणी केली जात आहे.शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसुल बुडीत होत असल्याने जिल्हाधिकारी संजय मीना यांना सदरची बाब निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे; अन्यथा सुरू असलेली दारे बंद होणार नसल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.

