- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखाद्या वस्तीत दारू पिणारेच नसणार,तर त्या ठिकाणी दारू विक्री केली जाणार काय? वा दारू विक्रेते उदयास येणार काय? याचे उत्तर हे नकारार्थीच असणार आहे.अश्याच प्रकारे भोंदूगिरी करणाऱ्यांचीही कथा अशीच आहे.लोकं अंधश्रध्देला खतपाणी घालतात,त्यामुळेच ढोंगी बाबांचा जयजयकार होतो आणि नंतर फुसका बार बाहेर पडतो.नुकतेच नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातने तथाकथित पूजेच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. मागील जन्मी तू राधा होतीस,मी कृष्ण होतो; या जन्मी आपली भेट झाली आहे.अशी विधाने करून,अशोक खरातने श्रध्देची सीमा पार केली.त्यातच,पालघर जिल्ह्याच्या वसईसारख्या भागांमध्ये मी महादेवाचा अवतार आहे; असा दावा करून महिलांचे शोषण करणाऱ्या ऋषिकेश वैद्य नामक भोंदू बाबाचे प्रकरणही उघडकीस आले आहे.सांगली जिल्ह्याच्या मिरजमध्ये काही वर्षापूर्वी एका वडिलांनी आपल्या दहा वर्षांच्या मुलाला काळी जादू करण्यास प्रोत्साहन दिले.त्यांनी त्याचे नाव ‘बाल महाराज’ ठेवले आणि लोकांकडून पैसे उकळण्याचा धंदा चालवला.सदरचा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उघडकीस आणला होता.पुण्यात काही दिवसांपूर्वी एका भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार उजेडात आला.दोष निवारणाच्या नावाखाली एका भोंदूबाबाने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चांडोली येथे समोर आला आहे.येथील शिवदत्त आश्रमात ‘महाराज’ म्हणून वावरणाऱ्या नवनाथ गवळी वय ४८ वर्षे याने हा प्रकार केल्याचा आरोप एका पीडित महिलेने केला आहे.राजगुरुनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून,आरोपी फरार आहे.दोष निवारण करून देण्याच्या बहाण्याने नवनाथ गवळी याने विनयभंग करत शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.सुरुवातीला भीतीपोटी हा प्रकार दडपला गेला.मात्र,आता पीडितेने धाडसाने तक्रार दिल्यानंतर हे संतापजन कृत्य उजेडात आले आहे.गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट असल्याने स्थानिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल ३६ जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांनी बनावट बाबांशी संबंधित दीड हजाराहून अधिक घटनांची नोंद केली आहे.फसवणुकीच्या बळींच्या तक्रारी असूनही, फसवणूक करणाऱ्या बाबांना सोडून देण्यात आले.खरे तर,सर्व पुरावे सादर करून पोलिसांनी स्वतःच गुन्हे दाखल करायला हवे होते,पण तसे झाले नाही.बहुतेक प्रकरणांमध्ये राजकीय दबाव,पोलिसांचा असहकार आणि तक्रारदारांच्या अनुपस्थितीमुळे न्यायालय भोंदू बाबांची निर्दोष सुटका करते. त्यामुळेच,जय हो..ढोंगी बाबांचे कारनामे..! असे म्हणणे चुकीचे ठरणार तर नाहीच,पण सुशिक्षित लोकं येळे बनून पेडे खात असल्यानेच सर्वकाही घडू लागलेत.विशेष म्हणजे, आपली संस्कृती,परंपरा आणि अपार श्रद्धा ही एखाद्याकडे वळवणारी आहे.अनेकांना कुणाच्या मनात काय चाललेय,याची जाण नसते आणि याचाच फायदा हे ढोंगी बाबा घेत असतात.त्यामुळे,ढोंगी बाबांपासून सावध राहणे आवश्यक आहे.
- Advertisement -

