- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-ज्ञान,संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, नैनपूर येथे वाचनालयाचे भव्य उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक कृषि अधिकारी कल्पना ठाकरे(उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, देसाईगंज),झाडीपट्टी नाट्यसंस्कृतीचे कलावंत शेखर पटले यांच्या हस्ते करण्यात आले. “प्रयत्न कधीही सोडू नका,अपयश हा यशाचा टप्पा आहे.वाचनातून नवनिर्मितीची कला फुलते,” असे विचार प्रकट करत शेखर पटले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.तर कल्पना ठाकरे यांनी “वाचन हे भाषा कौशल्य वृद्धिंगत करणारे साधन असून वाचनालयातूनच उद्याचे सुजाण नागरिक घडतात. ‘वाचेल तो टिकेल’ हा संदेश प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात केला पाहिजे,” असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणातून उमाकांत कवासे यांनी “जसे गावात मंदिर बांधले जाते,तसेच प्रत्येक गावात वाचनालय उभारले गेले पाहिजे.वाचनालय हेच खरे ज्ञानमंदिर आहे,” असा प्रभावी संदेश दिला.या वाचनालयासाठी विविध दात्यांनी सहकार्याचा हात दिला असून समाजातील उदार दात्यांकडून ११ हजार रुपयांची देणगी,तर शिवराम हाके यांचेकडून १२ महिन्यांचा लोकमत वृत्तपत्र पुरवठा तसेच दैनीक नवराष्ट्र वृत्तपत्राचे देसाईगंज तालुका प्रतिनिधी
दिलीप कहूरके यांच्याकडून नवराष्ट्र वृत्तपत्राचा पुरवठा उपलब्ध करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वर गहाणे यांनी, सूत्रसंचालन मंगेश तुपट यांनी तर आभारप्रदर्शन कुमारी तृषाली सुखदेवे यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून साकारलेले हे शालेय वाचनालय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणारे ठरणार असून “सुजाण नागरिक घडविण्याचे केंद्रस्थान” म्हणून कार्यरत राहणार आहे.प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुरुषोत्तम मेश्राम,सदस्य उमाकांत कवासे,मुख्याध्यापक खेमराज तिघरे, शिक्षकवृंद,पालक वर्ग,समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले.
- Advertisement -

