- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-गेल्या सात दिवसांपासून
कुरखेडा तालुक्याच्या घाटी येथील ग्रामस्थांचे रेतीचा ट्रॅक्टर पकडलेच कसे? म्हणून गावातील हनुमान मंदिर परिसरात आमरण उपोषण सुरू आहे.विशेष म्हणजे,घाटी येथील ग्रामस्थांनी घरकुल बांधकामासाठी रेतीची गरज भासल्याने ग्रामपंचायतीत ग्रामसभा बोलावून रेती घाटातून रेती वाहतूक करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार ज्या घरकुल धारक लाभार्थ्यांना घरे आलीत अशांसाठी रेती आणली जात होती.मात्र,मंडळ अधिकारी किरंगे यांनी गावातीलच घरकुल लाभार्थ्याला रेती टाकत असतांनाच रेतीसह ट्रॅक्टर पकडुन कुरखेडा तहसील कार्यालयात पुढील शास्तीच्या कारवाईसाठी जमा केला.त्यामुळे गावकऱ्यांनी घेतलेल्या ग्रामसभेच्या अधिकारांचा अवमान करण्यात आला असल्याने ७ जुलै २०२५ पासून आमरण उपोषणाचा पावित्रा घेण्यात आला आहे.

सदरची बाब आमदारांच्या कानी पडताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट दिली.प्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधतांना आमदार मसराम म्हणाले की,ग्रामसभा ही गावातील निर्णय घेणारी कायदेशीर संस्था आहे.ती गावाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावते. गावच्या ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयात शासन,यंत्रणा हस्तक्षेप करूच शकत नाही.त्यामुळे गावकऱ्यांची मागणी ही रास्त आहे.पकडलेला ट्रॅक्टर सोडणे आवश्यक आहे व त्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी,असे मसराम म्हणाले.घरकुल उभारणीसाठी रेतीची आवश्यकता होती आणि ती ग्रामसभेच्या लेखी मंजुरीनंतरच वाहतूक करण्यात आली होती. मात्र,तरीही ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी आमरण उपोषणासह आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कुरखेडा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट,कुरखेडा तहसीलदार धनबाते, कुरखेडा पोलिस निरीक्षक वाघ व ग्रामसभा सदस्य प्रकाश ठाकूर,फाल्गन कुथे,नितेश कवाटकर, फाल्गुन मेश्राम,दीपक भोयर,त्र्यंबक नाकाडे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
- प्रमुख मागण्या👇
- जप्त केलेले ट्रॅक्टर विनाशर्त तात्काळ सोडण्यात यावे.
- ग्रामसभेच्या पूर्व परवानगीशिवाय शासकीय अधिकाऱ्यांनी गौण खनिज संपत्तीच्या वापरावर कारवाई करू नये,याबाबत लेखी आश्वासन.
- मंडळ अधिकारी किरंगे यांनी ग्रामसभेच्या अधिकारांचा अवमान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
- Advertisement -

