- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-तणावात गेलेल्या एका तरुण व्यावसायिकाने नैराश्यात जाऊन टोकाचे पाऊल उचलत आईला फोन करून ‘हा माझा शेवटचा फोन आहे,’ असे म्हणत चक्क नदीत उडी मारली.मात्र,पोलिसांच्या तत्परतेने व समयसूचकतेने व्यावसायिकाचे प्राण वाचले.पंकज नामक व्यावसायिकाचा वाडी परिसरात कारखाना आहे.त्याने काही महिन्यांपूर्वी जेसीबी खरेदी केल्या. खरेदी केलेल्या जेसीबी त्याने इतरांना किरायाने दिल्या. मात्र, किरायाने दिलेल्या जेसीबीतून पाहिजे त्या प्रमाणात मोबदला मिळाला नाही व आर्थिक नुकसान झाल्याने तो तणावात गेला.तणावात जाऊन त्याने स्वतःचा जीव देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार शनिवार २८ जून रोजी तो वाहनाने घरातून निघाला व फुटाळा तलावाजवळ पोहोचला खरी,पण आत्महत्या करण्याचे धाडस त्याला करता आले नाही.परत काल सोमवारी दुसऱ्यांदा तो मौदा येथील नदीवर पोहोचला. त्याने त्याची गाडी पार्क केली.नदीत उडी मारण्यापूर्वी,पंकजला त्याच्या ६ वर्षाच्या मुलीची आठवण आली व त्याने आईला फोन केला.त्याने तिला हा शेवटचा फोन असून मुलीची तसेच पत्नीची काळजी घे,असे म्हटले. त्याचे रडतानाचे बोलणे ऐकून त्याच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली.तिने त्याला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला.अगदी मातृत्वाची शपथ देत परत येण्यास सांगितले.मात्र,त्याने मी जीवन संपवतो आहे,असेच उत्तर दिले.दरम्यान,त्याच्या वडिलांनी वाडीतील एएसआय विनोद कांबळे यांना या प्रकाराची माहिती दिली.पोलिसांनी लगेच त्याच्या मोबाइलचे लोकेशन शोधले व तो मौदा येथे नदीजवळ असल्याची बाब समोर आली.पोलिसांचे पथक त्या दिशेने रवाना झाले.मौदा येथील स्थानिक पोलिसांनादेखील माहिती देण्यात आली.इकडे त्याच्या पत्नीने त्याला फोन करून परत येण्यास सांगितले. मात्र,तो त्याच्या भूमिकेवर कायम होता.तिने त्याला बोलण्यात गुंतविले.तेवढ्या वेळात पोलिस व स्थानिक लोक तेथे पोहोचले.त्यांना पाहताच व्यावसायिकाने फोन ठेवला व त्याने थेट नदीत उडी मारली.ते पाहून पोलिस व स्थानिक लोकांनीदेखील नदीत उड्या मारत त्याला बाहेर काढले.त्याला सुखरूपपणे वाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले व तेथे त्याचे समुपदेशन करण्यात आले.
- अन् अश्रूंचा बांध फुटला👇
व्यावसायिकाच्या कुटुंबीयांची या संपूर्ण कालावधीत अगदी वाईट अवस्था झाली होती.तो जिवंत परत येईल की नाही हीच चिंता त्यांना सतावत होती.मात्र,त्याला सुखरूप डोळ्यासमोर पाहताच कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला व असा अविचार कधीही मनात आणू नये यासाठी अक्षरशः हात जोडून विनंती केली.
- Advertisement -

