नागपूर :-जन्मदात्या आई-वडिलांना ठार मारणारा अभियांत्रिकीचा विद्यार्थी उत्कर्ष डाखोळे याने सुनियोजित पद्धतीनेच हा कट रचल्याची बाब पोलिस चौकशीतून समोर आली आहे.वडिलांवर त्याने चाकूने वार केल्यानंतर त्यांनी त्याला असे न करण्याची वारंवार विनंती केली होती.मात्र,त्याच्या डोक्यात सैतानच संचारला होता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्षने काही महिन्यांअगोदर त्याच्या एका मैत्रिणीला आई-वडिलांची भेट करायला नेले होते.त्यावर संतापलेल्या वडिलांनी त्याच्यावर हात उगारला होता.त्याचा रागदेखील त्याच्या मनात होता.२१ वर्षीय उत्कर्षने २६ डिसेंबर रोजी वडील लीलाधर डाखोळे वय ५० वर्षे आणि आई अरुणा डाखोळे वय ४२ वर्षे यांची हत्या केली होती.घटनेच्या वेळी त्याची बहीण कॉलेजला गेली होती.ती आल्यावर गुपित उघड होईल या भीतीने त्याने तिला कोराडी येथील बैलवाडा येथील घरी नेले.काका व बहिणीला आई-वडील ध्यानासाठी बंगलोरला गेले असल्याचे सांगितले. १ जानेवारीला सकाळी ही घटना उघडकीस आली.उत्कर्ष भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये सतत नापास होत होता. बैलवाडा येथे शेतीचे काम करून तेथील आयटीआय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्याचे पालक त्याच्यावर दबाव आणत होते.२६ डिसेंबरला सकाळी अंत्यसंस्काराला जाण्यापूर्वी वडिलांनी ‘मी परत येईपर्यंत बैलवाड्याला जा,मला तुझे तोंड बघायचे नाही’, असा इशारा दिला होता.यानंतर आईने त्याचे कपडे बॅगमध्ये भरण्यास सुरुवात केली होती. बैलवाड्याला जाण्यापासून सुटका नाही म्हणून उत्कर्ष अस्वस्थ झाला.यानंतर त्याने दोघांनाही मारण्याचा निर्णय घेतला.सर्वप्रथम त्याने आई अरुणा यांचा गळा आवळून खून केला.त्यानंतर तो टीव्ही बघू लागला आणि वडिलांची परत येण्याची वाट पाहू लागला. त्याने वडील आल्यावर त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला व नंतर चाकूने वार केले. ‘तू मला मारू नको’ अशी विनंती ते वारंवार करत राहिले.मात्र,उत्कर्षने चाकूने वार करीत त्यांची हत्या केली.चौकशीदरम्यान तो मधेच पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांसोबत २४ तास उलटूनही उत्कर्षच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चात्ताप दिसून आलेला नाही. कपिल नगर पोलिसांनी उत्कर्षला न्यायालयात हजर केले असता त्याला ७ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.


