- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-एखाद्या खाजगी वा सार्वजनिक ठिकाणी गदारोळ होऊन कुणावर शाई फेकली जाते तर कुणाला काळे फासले जाते.असा काहीसा प्रकार अनेक ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वत्र बघितला आहे.मात्र,कडेकोट बंदोबस्त, सुरक्षा व फौजफाटा असतांनाही न्याय मंदिरात एखादी अनुचित घटना घडत असेल तर यांस जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जातो.न्यायाधीशांवर चप्पल भिरकावणे आणि बंदुकीसह संचार या दोन्ही प्रकरणांत सखोल चौकशीनंतर तब्बल ११ पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.२१ डिसेंबरला दुपारी न्यायालयीन कामकाज सुरू असतांनाच कल्याण जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.वाघमारे यांच्या दिशेने खून प्रकरणातील आरोपीने चप्पल भिरकावली होती.शिवाय त्याच दिवशी एक बंदूकधारी खासगी सुरक्षा रक्षक न्यायालय आवारात फिरत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेऊन पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी,कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत न्यायालयीन कर्तव्यावरील ११ पोलिसांना काल,गुरुवारी २६ डिसेंबरला सेवेतून निलंबित केले.यात एका पोलिस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.विशेष म्हणजे चप्पल भिरकावणे आणि बंदूकधारी या दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.चप्पल फेकल्याच्या घटनेनंतर आरोपीच्या सोबत असलेले पोलिस काय करत होते? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
दरम्यान,याच न्यायालयातील दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन कामासाठी आवारात आलेल्या व्यक्तीसोबत एक बंदूकधारी खासगी सुरक्षा रक्षक फिरत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. न्यायालयाच्या आवारात शस्त्र घेऊन फिरण्यास प्रतिबंध असतांना बंदूकधारी इसम न्यायालय आवारात आलाच कसा? असा सवाल वकिलांकडून उपस्थित करण्यात आला.याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चौकशी करण्यात आली.न्यायालयाच्या आवारात कर्तव्यावर असलेले पोलिस कर्तव्यात हयगय करीत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्यानंतर ११ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
- Advertisement -

