उद्रेक न्युज वृत्त
पुणे :- चालू वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे व रासायनिक खते ही निश्चित करून दिलेल्या दरानुसारच उपलब्ध करून द्यावीत.बियाणांची आणि रासायनिक खतांची जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना जास्त दराने बियाणे व खतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर प्रसंगी फौजदारी खटले भरण्याचा इशारा राज्याच्या कृषी विभागाने दिला आहे.
राज्यात यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात १ लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली आहे.यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बियाणे आणि रासायनिक खतांची गरज शेतकऱ्यांना लागणार आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील काही बी- बियाणे आणि खते विक्रेते हे जाणीवपूर्वक बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचे राज्याच्या कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीच्या दराने बियाणे व खतांची खरेदी करावी लागत आहे.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने हा इशारा दिला आहे.या वृत्ताला कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सध्याची बियाणांची एकूण मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी आहे.मात्र क्षेत्रात वाढ झाल्यामुळे राज्याच्या कृषी विभागाने यंदा २४ लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे.यापैकी आतापर्यंत १३ लाख क्विंटल वितरित करण्यात आले आहे. दरम्यान,कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी खरीप हंगाम पूर्व तयारीबाबतची आढावा बैठक घेतली. दरम्यान, राज्याच्या कृषी विभागाने बियाणे व खते यांचे गैरव्यवहार रोखून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी काही कृषी कायदे प्रस्तावित केले आहेत.हे कायदे विधिमंडळाच्या विचारार्थ प्रलंबित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
टास्क फोर्स स्थापन करणार दरम्यान, चालू वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे बियाणे योग्य भावात मिळावेत आणि रासायनिक खतांचा मुबलक साठा व त्याचे योग्य वितरण व्हावे, या उद्देशाने एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा आदेश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाला दिला आहे. या आदेशानुसार कृषी विभागाच्या वतीने टास्क फोर्स स्थापन केले जाणार आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून खरीप हंगामातील बियाणे व खतांच्या उपलब्धतेबाबतची योग्य कार्यवाही करता येणार आहे.

