- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी,दिव्यांगांना निधी यासह १७ मागण्यांसाठी ८ जून २०२५ पासून १४ जून २०२५ पर्यंत अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.विरोधी पक्षातील नेत्यांसह विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.त्यानुसार आंदोलनाची महायुती सरकारने दखल घेत बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिल्याने तब्बल सातव्या दिवशी अन्नत्याग आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आला होता.शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार योग्य वेळी निर्णय घेईल,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.मात्र,अजूनपावेतो शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला नसल्याने आता शेतकरी कर्जमाफी देण्यास सरकारला बाध्य करू,या उद्देशातून शेतकरी,दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे येत्या,मंगळवार २८ ऑक्टोंबरला ‘महाएल्गार’ मोर्चाचे आयोजन केले आहे. बच्चू कडू यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना नागपुरातील परसोडी वर्धा रोड,जामठा येथील कापूस संशोधन केंद्राच्या बाजूच्या मैदानावर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.शेतकऱ्यांच्या शेतमामालाला योग्य हमीभाव मिळत नाही.त्यामुळे शेतमाल कमी किंमतीत विकावा लागतो आहे. शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचत नाहीत. शेतकरी आता अधिक कर्जबाजारी होत आहे.तरीही शेतकरी कर्जमाफी केली जात नाही आणि त्याची योग्य वेळ येत नाही; हे दुर्दैव असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणी बोलत नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुळापासून धोरणे बदलली पाहिजेत,असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.मंगळवारी होणाऱ्या महाएल्गार आंदोलनात ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी,स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती,राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर,अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ.अजित नवले,स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप,शेतकरी नेते प्रकाश पोहरे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे अध्यक्ष विठ्ठलराजे पवार आदी सहभागी होणार आहेत.
- Advertisement -

