उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- लाखो समर्थकांचा जनसागर घेऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील अरबी सागराच्या दिशेने निघाले आहेत.ही वज्रमूठ शुक्रवारी मुंबईत धडक देण्यास सज्ज झाली आहे.तथापि,राज्यातील महायुती सरकारकडून मनधरणीचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.शेवटचे वृत्त हाती आले तोवर जरांगे मुंबईत येण्याच्या हट्टावर ठाम होते.मुंबईत पोहोचल्यावर आज पासून म्हणजेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.दरम्यान, गुरुवारी मध्यरात्रीनंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे हे वादळ मुंबईच्या उंबरठ्यावर म्हणजे वाशी- खारघरपर्यंत येऊन थांबल्याचे वृत्त आहे.मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची जरांगे पाटील यांची मागणी आहे. गुरुवारची रात्र मुंबईच्या वेशीवर काढल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी हा ताफा मुंबईकडे दाखल करण्यात आला आहे.लाखोंच्या संख्येने असलेले मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यानंतर शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजून मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाखोंच्या संख्येने असलेले मराठा आंदोलक सामावू शकतील अशी एकमेव जागा म्हणजे खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान हीच आहे.मराठा आंदोलकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये अशी जागा सरकारने सांगावी,असे उच्च न्यायालयाने दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी स्पष्ट केले. त्यामुळे सरकारने आंदोलकांसाठी नवी मुंबईतील खारघर मैदान हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले आहे.
वाहतूक व्यवस्था कोलमडणार: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.वेगवेगळ्या वित्तीय संस्थांची कार्यालये या शहरात आहेत.तसेच इतर केंद्रेही आहेत. जवळपास ६० ते ६५ लाख चाकरमानी दररोज शहरात लोकल आणि दळणवळणाच्या अन्य साधनांनी प्रवास करतात.मराठा आंदोलक त्यांची वाहने घेऊन एवढ्या मोठ्या संख्येने शहरात आले, तर त्याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसेल.संपूर्ण यंत्रणाच कोलमडून पडेल;असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

