- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-तीन महिन्यांपासून निराधारांचे मानधन रखडल्याने मानधनावर जीवनयापन करणाऱ्या गरीब, गरजू,निराधारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार,इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ, श्रावणबाळ,तसेच राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेअंतर्गत, वृद्ध,अपंग,दिव्यांग,अविवाहित महिला, विधवा, घटस्फोटित,परित्यक्ता,कुष्ठरोगी,निराधार,दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांचे अनुदान तीन महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.समाजातील दीनदुबळे, मागासवर्गीय,विमुक्त आणि भटक्या जाती, जमाती,इतर मागासवर्गीय,वृद्ध,दिव्यांग,अविवाहित, क्षयरोगी, घटस्फोटीत,परित्यक्ता,कुष्ठरोगी,एड्स व्यक्तींना केंद्र आणि राज्य सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते.मात्र,लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांपासून अनुदानच जमा झाले नाही.विधानसभा निवडणुकीनंतर मानधन जमा होईल,अशी अपेक्षा होती. परंतु,अद्याप त्याबाबत काहीच झालेले नाही.सरकारने लाडकी बहीण योजनेचे अनुदान हिवाळी अधिवशेन संपताच जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान,निराधारांच्या बाबतीत तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होत आहे.आपल्याला चार पैशांचा आधार मिळेल, या अपेक्षेने निराधार महिला-पुरुष कार्यालयाकडे वारंवार हेलपाटे मारत आहेत.मात्र,तीन ते चार महिन्यांपासून त्यांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा न झाल्याने अनेकांवर उसनवारीची वेळ आली आहे.आधीच तुटपुंजे अनुदान अन् तेही महिनोमहिने मिळत नसल्यामुळे त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा आहे.
- Advertisement -

