- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-अनादिकाळापासून ते आजही कार्तिक पौर्णिमा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उत्साहात साजरी केली जाते.विशेष करून,ग्रामीण भागात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्व दिले जाते.या दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला होता,असे मानले जाते.त्यातच भगवान भोले शंकराच्या भक्तांसाठी कार्तिक पौर्णिमेचा दिवस मोठा मानला जातो.विशेष म्हणजे,या दिवशी भगवान भोले शंकरांनी त्रिपुरासूर या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ तसेच ‘देवांची दिवाळी’ असेही म्हणतात कारण की,याच दिवशी देव-देवतांनी दिवे लावून आनंद साजरा केला होता,असे पुराण कथांमध्ये वर्णिले आहे.अश्यातच ऐन कार्तिक पौर्णिमेच्या जवळ दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार तर पार पडले,पण जळालेल्या दोन मृतदेहांची राख अन् हाडे अज्ञातांनी स्मशानभूमीतून चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने उमरेड शहर तसेच परिसरातील गावकरी भयभीत झाले आहेत.उमरेड शहराच्या भिवापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या स्मशानभूमीत सदरचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.महत्वाचे म्हणजे,मृतदेहांची राख अन् हाडे चोरून नेलेल्या घटनेत एका २३ वर्षीय मृत तरुणीचा आणि ४८ वर्षीय व्यक्तीचा समावेश असून घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की,साक्षी सुनील पाटील वय २३ वर्षे रा.बालाजी नगर,उमरेड,जि.नागपूर आणि नरेश दुर्योधन सेलोटे वय ४८ वर्षे,रा.परसोडी,उमरेड अशी मृतांची नावे असून उमरेड येथील शेतकरी कुटुंबातील साक्षी पाटील हिचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. तर परसोडी येथील नरेश सेलोटे या मजुराचा रविवार २ नोव्हेंबरला आजारपणाने मृत्यू झाला होता.दोघांच्याही पार्थिवावर सोमवारी ३ नोव्हेंबरला दुपारी एक वाजताच्या सुमारास भिवापूर मार्गावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांच्याही मृतदेहांना मुखाग्नी देण्यात आल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल मंगळवारी सकाळच्या सुमारास मृत नरेश सेलोटे यांच्याकडील कुटुंबीय स्मशानभूमीत राख आणि अस्थी गोळा करण्यासाठी गेले असता राख आणि अस्थी गायब असल्याचे दिसून आले.त्यातच मृत साक्षी पाटील या तरुणीचीही राख आणि अस्थी गायब झाल्याचे दिसून आले.लागलीच याबाबत उमरेड पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिस यंत्रणा,नगरपालिका प्रशासन स्मशानभूमी परिसरात दाखल होऊन तपासणी केली असता दोन्ही पार्थिवाच्या राखेतून उरलेल्या हाडांचे एकही अवशेष स्मशानभूमीवर सापडले नसल्याने सर्वजण अवाक् झाले.आज,बुधवार ५ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेचा दिवस आहे.ऐन कार्तिक पौर्णिमेच्या एक दिवसांपूर्वीच दोही मृदेहांची राख आणि हाडे स्मशान भूमीतून गायब झाल्याने शंका-कुशंका वाढीस लागून नागरिक भयभीत झाले आहेत.प्रकरणी उमरेड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध आणि त्याचे समूळ उच्चाटन २०१३ कायद्यान्वये अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार धनाजी जळक व उमरेड पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

