उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- पोलिस भरती २०२२-२३ मध्ये अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केलेले आहेत.एका पदासाठी एकच अर्ज दाखल करणे आवश्यक असताना अनेकांनी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज केल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे अशा उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी काढलेल्या नोटिशीमध्ये म्हटले की,सन २०२२-२३ पोलिस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केले आहेत.त्यामुळे त्या उमेदवारांनी त्यांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पत्त्यानुसार यादी तपासून हमीपत्र सादर करावेत. उमेदवारांचा एका पदासाठी एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे.त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस कार्यालयामध्ये उमेदवारांना समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.एका पदासाठी एकच अर्ज ग्राह्य असून अनेक अर्ज केल्याची माहिती कार्यालयाने द्यावी व एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल, अशी समज द्यावी असे आदेशामध्ये म्हटले आहे.सर्व जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत.याद्वारे उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेऊन ज्या घटकासाठी अर्ज करावयाचा आहे त्याचा तपशील त्या मागवला आहे.सदर माहिती १७ मे २०२४ पर्यंत पाठवण्याचे नोटिशीमध्ये म्हटले आहे.त्यामुळे उमेदवारांना याबाबतचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.

