- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्य मंत्री मंडळाच्या वतीने आज,बुधवार २२ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळ बैठक पार पडली.बैठकीत चार महत्वाचे धडाकेबाज निर्णय घेण्यात आले असून नगर रचना विकास विभागाच्या वतीने चालू वर्षात महाराष्ट्र बायोगॅस धोरण २०२६ जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर, साताऱ्यात नवा आयटी पार्क,शिक्षकांसाठी आणि जमिनी संदर्भात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्र बायोगॅस धोरण २०२६ जाहीर(नगर विकास विभाग):-वाढता कचरा आणि ऊर्जेची गरज लक्षात घेता ‘महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण २०२६’ ला मान्यता देण्यात आली आहे.चालू वर्षासाठी तब्बल कोटींची तरतूद करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती नेमली जाणार आहे.सदरचे प्रकल्प पीपीपी आणि हायब्रीड अन्युईटी तत्त्वावर राबवले जाणार असून,यामुळे हरित गृह वायूंचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे.
शिक्षकांसाठी मोठी घोषणा(शिक्षण विभाग):-
राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार आहे.तसेच,या शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आगामी पद भरतीमध्ये अतिरिक्त गुणांचा लाभ मिळणार आहे,ज्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी नोकरीचा मार्ग सुकर होईल.
जमिनीच्या नियमात बदल(महसूल विभाग):-
कमाल जमीन धारणा मर्यादेनुसार भोगवटादार वर्ग-२ मधील जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या अधिमूल्याची पुनर्रचना करण्यात आली आहे.या संदर्भातील नवीन अधिसूचना काढण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे.
साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन
(महसूल विभाग ):-सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील नागेवाडी येथे आयटी पार्क उभारण्याचा मोठा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.यासाठी एमआयडीसीला म्हणजेच औद्योगिक प्रकल्पासाठी ४२.५५ हेक्टर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- Advertisement -

