उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबाबत महाराष्ट्रातील महायुती सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, या योजनेचा गैरवापर थांबवण्यासाठी एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नवीन नियमांनुसार एका महिलेचे लग्न झाले असेल तर दुसऱ्या अविवाहित महिलेलाही हा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना सहज मिळावा; यासाठी राज्य सरकार अटी व शर्ती सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.सरकारने अधिवास प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला आणि इतर काही नियम मंगळवारी शिथिल केल्यानंतर आणि अर्जाची तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढवल्यानंतर सरकारने बुधवारी या योजनेची व्याप्ती आणखी वाढवण्याची घोषणा केली.
फडणवीस म्हणाले, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत कुटुंबनियोजन करून आपण काही चूक केली आहे का?, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू नये.कोणतीही विषमता नाही हे लक्षात घेऊन एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

