उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- लाच घेण्याचा हल्ली नवनवीन फंडा जरी वापरला जात असला तरीही एक ना एक दिवस घडा भरल्याशिवाय राहणार नाही.गोर-गरीब जनतेचे जेवढे मन दुखवाल तेवढीच गोर गरीबांची हाय लागणार आहे.अशीच हाय विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास लागली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दोन लाचखोरांना वेगवेगळ्या कारवाईत अटक केली. विशेष बाब म्हणजे राजुरा तालुक्यात महावितरणच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला पैसे नसतील तर लाचेपोटी २० किलो तांदळाची मागणी केली.एसीबीने त्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले.लाचेत तांदळाची मागणी करणारी भ्रष्टाचाराची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. तर दुसरी लाचेची कारवाई ही ब्रम्हपुरी तालुक्यातील आहे.कंत्राटदाराकडून लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला ताब्यात घेण्यात आले.या दोन्ही कारवाया एसीबीने शुक्रवारी केल्या.
राजुरा तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पंपाची व्यवस्था केली होती.मात्र पंपासाठी थ्री फेज विद्युत पुरवठा असण्याची गरज असते.फिर्यादी व इतर शेतकऱ्यांचे शेत विरूर महावितरण कार्यालय अंतर्गत येते व विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याचे काम राजुरा उपविभागीय वरिष्ठ तंत्रज्ञ शालेंद्र देवराव चांदेकर यांच्या अंतर्गत येते.विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी चांदेकर यांनी फिर्यादी व इतर शेतकऱ्यांना प्रत्येकी २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये असे एकूण ७ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती.पैसे देण्याची इच्छा नसलेल्या फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.शुक्रवारी चंद्रपूर लाचलुचपत विभागाने सापळा रचत ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शालेंद्र चांदेकर याला अटक केली.

