संपादकीय
संपादक/सत्यवान रामटेके
उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मानव व वन्य प्राणी संघर्ष होतांना दिसून येत आहेत.रात्रौ तसेच दिवसाढवळ्या जंगलातील हिंस्त्र प्राणी शेतकरी बांधव व इतर सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला चढवून ठार करीत आहेत.त्याच बरोबर जंगलातील वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात लावलेल्या पिकांची नासधूस करून मोठ्या प्रमाणावर नुकसान करून जीव टांगणीला आणीत आहेत.अशातच काही ठिकाणी रात्रोच्या सुमारास शेतकरी कृषिपंपाच्या माध्यमातून शेतीला पाणीपुरवठा करीत असल्याने हिंस्र प्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करतात.यात शेकडो शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत.प्राण गमावून अनेकांना वन विभागाकडून जरी मोठी रक्कम दिली जात असली तरीही एखाद्या कुटुंबातील कमावता व्यक्ती जेव्हा मृत पावतो तेव्हा ज्याचे त्यांनाच कळत असते.पैसा आज आहे अन् उद्या नाही.जीवन एकदाच मिळतेय परत पुन्हा मिळत नसतो.
जंगल परिसरात एखाद्या व्यक्तीचा हिंस्त्र प्राण्यांमुळे जीव गेल्यास; वन विभागातील अधिकारी,कर्मचारी म्हणतात की,तुम्ही त्यांच्या क्षेत्रात कशाला जाता.मात्र ज्यांच्या आजोबा,पंजोबा व पूर्वजांपासून शेत्या आहेत; असे शेतकरी शेतावर जाणार की नाही? शेतातील कामे करणार की नाही?अधिकारी,कर्मचाऱ्यांना महिना भरला की,वेतन मिळतोय.मात्र दिवसरात्र जिवाचे रान करून पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात राबणाऱ्या जगाच्या पोशिंद्याला मिळतो काय?लागत खर्च जास्त तर उत्पादन कमी.अशातही बँकांचे कर्ज,सततची नापिकी व इतर समस्यांना सामोरे जावे लागते.एखादेवेळी काही शेतकरी शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांच्या नासधूस करण्यापासून आळा घातला जावा; यासाठी शेत सभोवताल करंट लावणे वा इतर उपाययोजना करीत असतात.कधीकाळी त्यामध्ये एखाद्या वन्य प्राण्यांचा जीव जात असतो.वन्य प्राण्यांचा जीव गेला तर शेतकरी बांधव वा गोर-गरीब नागरिकांवर कारवाईच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात येतात.मात्र सर्वसामान्य नागरिक वा शेतकऱ्याचा हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास ‘त्यांच्या’ वन्य प्राण्यांवरही कारवाई वा गुन्हे दाखल कां नाही? महत्वाचे म्हणजे एखादा शेतकरी तसेच नागरिक कधीही कोणत्या वन्य प्राण्यांस ‘या’….!आमच्या शेतात ‘या’…! वा आमच्या गावामध्ये ‘या’….! असे म्हणीत नसतो.त्यामुळे वन विभागही तितकेच जबाबदार असल्याने यांच्यावर सुध्दा कारवाई सोबतच गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे.कारण की,ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर जास्त प्रमाणात आढळून येतो; अशा ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे.मात्र तसे न करता हात झटकण्याचा प्रयत्न केला जातो आहे.त्यामुळे ‘त्यांच्या’ वन्य प्राण्यांवरही कारवाई व्हायला हवी…! हे तितकेच महत्त्वाचे व खरे आहे.

