उद्रेक न्युज वृत्त
मुंबई:-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुधवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ ची घोषणा केली.ज्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. त्याचबरोबर आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली.१४ मे १९४६ रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म झाला.रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन,भजन,अध्यात्मिक वाचन याची आवड होती.याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे.गेले 30 वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले.त्याशिवाय वृक्षसंवर्धन,तलाव व स्वच्छता अभियान,रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते.
गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे.आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी,समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे.या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी १९४३ सालापासून केली होती आणि आज तेच कार्य तेवढ्याच जोमाने तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करीत आहेत.

