उद्रेक न्युज वृत्त :- एखादा दुकानदार धान्य देत नसेल तर ग्राहकांना दुसऱ्या रेशन दुकानाचा पर्याय देण्यात आला आहे. यासोबतच मजुरीसाठी बाहेर गावी किंवा बाहेर राज्यात जाणाऱ्या मजूर वर्गाला त्या-त्या ठिकाणीच आपल्या हक्काचे रेशन मिळावे; यासाठी रेशन पोर्टेबिलिटीची योजना लाभकारी ठरत आहे.नागपूर जिल्ह्याचाच विचार केला तर एकट्या मे महिन्यातच ६१ हजारावार लोकांनी याचा लाभ घेतल्याचे दिसून येते.
गरिबांसाठी रेशनचे धान्य एक मोठा आधार आहे. त्यातही आता मोफत धान्य मिळत आहे.त्यामुळे रेशनच्या धान्याला अधिक महत्त्व आले आहे.त्यातही अनेकदा दुकानदार बरोबर धान्य देत नाही; अशी ग्राहकांची ओरड असायची.त्यावर रेशन पोर्टेबिलिटी हा चांगला पर्याय ठरला आहे.यात आपण आपल्या आवडीचे रेशन दुकान निवडता येऊ शकते.नागपूर जिल्ह्यात याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्यात येत आहे.
वास्तविक,रेशन कार्ड पोर्टेबिलिटीमध्ये तुमचे रेशन कार्ड बदलणार नाही.रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला PDS दुकानांवर इलेक्ट्रॉनिक्स पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसवरून पडताळणी करावी लागेल.पडताळणी दरम्यान तुमच्याकडे तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे.ही पडताळणी फक्त आधार क्रमांकावरून केली जाते.अशा परिस्थितीत जर तुम्ही दुसर्या राज्यात किंवा बाहेर गावी असाल आणि तेथे रेशन कार्ड पोर्टेबिलिटीचा लाभ घ्यायचा असेल,तर उशीर न करता जवळच्या PDS दुकानात पोहोचा आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.रेशन कार्ड पोर्टेबिलिटीमुळे तुमचे रेशन कार्ड बदलणार नाही आणि तुम्हाला त्याच कार्डवर इतर राज्यांमध्ये वा इतर गावी,इतर शहरात रेशन मिळू लागेल.‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेत समाविष्ट राज्यांतील कार्डधारक रेशन कार्ड पोर्टेबिलिटीचा लाभ घेऊ शकतात. ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरू केल्यामुळे, कार्डधारक त्यांच्या सोयीनुसार देशातील कोठूनही रेशन घेऊ शकतात.हे स्पष्ट आहे की,कार्ड धारकासाठी कोणत्याही प्रकारच्या मर्यादा किंवा नियमांचे कोणतेही बंधन नाही आणि तो कोणत्याही राज्यात व बाहेर ठिकाणी रेशन खरेदी करू शकतो.रेशन पोर्टेबिलिटीची योजना ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे.

