- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-रेतीघाट सुरू तर होतात,मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैध वाळू उपश्याचा खेळ सुरू होऊन पर्यावरणाची ऐशीतैशी केली जात आहे.त्यांना कुणाशी काहीही देणे-घेणे नसते.बेसुमार उपश्यामुळे तिकडे शेतकऱ्यांच्या विहिरी तळाला लागोत वा नळ योजनेचा पाणीपुरवठा प्रभावित होऊन गेला तरी चालेल.अश्यांना केवळ छपाई केंद्र कुठून होतो,याचेच भान असते.लाखो रुपयांचा महिन्याकाठी मिळणारा पगारही विविध विभागातील अधिकाऱ्यांना कमीच पडतो आहे.अश्याच प्रकारे एका सुटबुटवाल्या तहसीलदाराला पैश्याची हाव सुटल्याने त्याने चक्क अवैध वाळू उपसा सुरू ठेवण्यासाठी तब्बल सात लाख रुपयांची लाच मागणी करून तडजोडीअंती ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची घटना आज, शनिवार ६ जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.सदरची सापळा कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी)छत्रपती संभाजीनगर येथील कासलीवाल मारव्हल सोसायटी,रो हाऊस नंबर ११९ येथे वास्तव्यास असणाऱ्या जालना जिल्ह्याच्या अंबड तहसील कार्यालयाचा तहसीलदार विजय चव्हाण याच्या घराच्या मुख्य गेटवरच कारवाई करण्यात आली.प्रकरणातील तक्रारदार यांच्याकडे सहा हायवा गाड्या असून ते जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या परिसरातून अधिकृत व अनधिकृत वाळू उपसा तसेच वाहतुकीचा व्यवसाय करतात.या गाड्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण याने महिण्याला तब्बल सात लाख रुपयांची मागणी केली होती.याबाबत चव्हाण याने २६ मे २०२६ रोजी सौदा केला होता; मात्र नेमक्या त्याच काळात अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण सुरू झाल्याने यात खंड पडला.दरम्यान,पैश्याची मोठी हाव सुटल्याने गेल्या दोन दिवसांपासून त्याने तक्रारदाराकडे पैशांसाठी तगादा लावला.परत तहसीलदार चव्हाण याने आज शनिवारी लाचेच्या रकमेची मागणी करत तक्रारदाराला थेट छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी पैसे घेऊन बोलावले.त्यानुसार,तक्रारदार लाखोंची रक्कम आणि बीड एसीबीच्या पथकासह छत्रपती संभाजीनगरला पोहोचले.येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तो आपल्या सोसायटीच्या मुख्य गेटबाहेर आला आणि तक्रारदाराने त्याच्या हातात ६ लाख ४० हजार रुपयांची लाचेची बॅग सुपूर्द करताच,बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून लाखो रुपयांचा पगार घेणाऱ्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा वरच्या कमाईशिवाय पोटच भरत नाही वाटते.लाचप्रकरणी लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण याचेवर छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- Advertisement -

