उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- नागपुरात किरकोळ कारणावरुन तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.खर्रा देण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून पिता-पुत्राने मिळून एका तरुणाची चाकूने वार करून हत्या केली आहे.हत्येची ही घटना वाठोडा येथील संघर्ष नगर झोपडपट्टीत मंगळवारी सायंकाळी घडली.देवी नगर गल्लीत राहणारा ३५ वर्षीय जितेंद्र गुर्जर असे मृतकाचे नाव आहे.आरोपींमध्ये ६० वर्षीय आनंदराव बावनकर आणि त्यांचा मुलगा दिनेश बावनकर (२६) यांचा समावेश आहे.या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे.
काल,मंगळवारी सायंकाळी आरोपी आनंदराव हा खर्रा घेण्यासाठी घराजवळील पान टपरी येथे गेला होता. त्यावेळी मृतक जितेंद्रही तेथे पोहोचला होता. दोघेही दारूच्या नशेत असल्याचं सांगण्यात येत आहे. या वेळी जितेंद्रने पान टपरीवरुन खर्रा विकत घेतला होता; त्यावेळी आनंदराव यांनी जितेंद्रला खर्रा खायला मागितला होता; मात्र जितेंद्रने खर्रा देण्यास नकार दिला.यावरुन दोघांमध्ये भांडण झाले.या भांडणात जितेंद्रने आनंदराव यांना मारहाण केली.मात्र, या घटनेनंतर आनंदराव यांनी त्यांच्या घरी जाऊन हा घडलेला प्रकार त्यांचा मुलगा दिनेश याला सांगितला.
यानंतर दिनेश त्याचे वडील आनंदराव यांच्यासह जितेंद्रच्या शोधात बाहेर पडले.घरापासून काही अंतरावर त्यांनी जितेंद्रला मद्यधुंद अवस्थेत पाहिलं. दिनेश याने जितेंद्रला आपल्या वडिलांना का मारलं? याचा जाब विचारला असता त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि आरोपी पिता-पुत्राने जितेंद्रवर चाकूने हल्ला करुन जितेंद्रला जखमी केले आणि तेथून पळ काढला.
जितेंद्र गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला पाहून परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या जितेंद्रला उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले.मात्र,नंतर दोघे पिता-पुत्र परिसरात फिरत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली.

