उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- कर्मचारी भरतीवरील बंदीचा निर्णय अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना लागू होत नाही; असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले आहे.तसेच या प्रकरणातील दिवंगत कर्मचाऱ्याच्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर देण्यात आलेली नोकरी कायदेशीर ठरविली आहे.न्यायमूर्तिद्वय रोहित देव व यानशिवराज खोब्रागडे यांनी हा निर्णय दिला आहे.
विकास कामडी असे मुलाचे नाव असून ते नगरधन, तालुका-रामटेक येथील रहिवासी आहेत.त्यांचे वडील सुखदास नगरधन मधील इंदिरा गांधी विद्यालयात प्रयोगशाळा सहायक होते.१७ जुलै २०१२ रोजी त्यांचा सेवेदरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे विकास यांनी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला होता.शिक्षणाधिकाऱ्यांनी २० जानेवारी २०१५ रोजी त्यांची शिपाईपदी नियुक्ती करण्याला मान्यता दिली; परंतु,शिक्षण उपसंचालकांनी ८ ऑगस्ट २०१८ रोजीच्या वादग्रस्त आदेशाद्वारे ती मान्यता रद्द केली होती.२ मे २०१२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कर्मचारी भरतीवर बंदी आणल्या गेली होती.त्यामुळे ही नियुक्ती केली जाऊ शकत नाही; असे कारण वादग्रस्त आदेशात देण्यात आले होते.त्याविरुद्ध विकास यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असता कर्मचारी भरतीवरील बंदीचा निर्णय अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना लागू होत नाही; असा निर्णय देण्यात आला.याशिवाय,विकास यांच्या थकीत वेतन व इतर आर्थिक लाभाच्या बिलांना नियमानुसार मंजुरी द्या; असेही निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले.विकास यांच्यातर्फे ॲड.संतोष चांडे यांनी बाजू मांडली.