उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-वाहतुकीचे नियम मोडूनदेखील ई-चलान भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या चालकांना मोठा दणका देण्याचा निर्णय राज्य परिवहन विभागाने घेतला आहे.राज्यात ४ कोटी २८ लाख चालकांनी अद्याप २ हजार ४२९ कोटी रुपयांची ई-चलानची थकबाकी भरलेली नाही.यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारला वाहनचालकांचे बँक खाते ई-चलानशी लिंक करण्याच्या परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.
जानेवारी २०१९ पासून ई- चलान अस्तित्वात आले. वाहनचालकांना हँडहेल्ड डिव्हाईसेस आणि सीसीटीव्हीच्या आधारे वाहतूक पोलिसांकडून ई-चलानद्वारे वाहतूक उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात येतो.जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत ७ कोटी ५३ लाख ३६ हजार २२४ पेक्षा जास्त वाहनचालकांना राज्यात ई-चलानद्वारे ३ हजार ७६८ कोटींचा दंड आकारण्यात आला आहे.परंतु, वाहनचालकांनी मार्च २०२४ पर्यंत केवळ १ हजार ३३९ कोटी रुपयांची थकबाकी भरली आहे. अतिवेगाने वाहन चालविणे,लेन कटिंग आणि सिग्नल ओलांडणाऱ्या वाहनचालकांना ई-चलान जारी होते.
ते वसूल करण्यासाठी वारंवार मोहिमा राबविल्या जातात.परंतु, तरीदेखील वाहनचालक दंड भरत नाहीत.त्यामुळे राज्य परिवहन विभागाने वाहनचालकांच्या बँक खात्याशी ई- चलान लिंक करण्याची भूमिका घेतली आहे.
फास्टॅग आणि वार्षिक मोटार विमा भरण्यासाठी जोडलेल्या बँक खात्याशी ई-चलान जोडण्यात येईल. जेव्हाही वाहनचालक त्याच्या फास्टॅगमध्ये रक्कम भरेल किंवा वाहनाचा विमा भरण्याचा प्रयत्न करेल तेव्हा थकबाकीची रक्कम वसूल करण्यात येईल.

