- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-सत्तेच्या राजकारणामुळे एकेकाळी दुरावलेले भाऊ आता पुन्हा एकत्र दिसणार काय? दिसणार तर त्यांची एंट्री कशी असेल आणि ते काही राजकीय संदेश देतील का? याबाबतची उत्सुकता निर्माण झालेली असतांनाच गेल्या १९ ते २० वर्षांपासून ज्या दिवसाची वाट अनेकजण पाहत होते तो दिवस आज,शनिवार ५ जुलै २०२५ रोजी उजळला अन् अखेर माय मराठीसाठी तब्बल २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आलेच.यांना एकत्र आणण्यामागे मराठी भाषेवरील प्रेम हेच प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.अलीकडेच महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा धोरणाबाबत एक आदेश जारी केला होता,ज्यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला.या आदेशाला दोन्ही ठाकरे बंधूंनी तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्या विरोधामुळे सरकारने आपल्या आदेशावर ‘यू-टर्न’ घेतला आणि हिंदी सक्तीबाबतचा आदेश रद्द केला.
सरकारच्या या निर्णयाला आपला आणि मराठी भाषेचा विजय मानत आज हा ‘विजयी मेळावा’ वरळीतील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता.उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एन्ट्रीला एक खास गाणे वाजविण्यात आले. ‘कोण आला रे, कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला.आपले साहेब ठाकरे-ठाकरे… हे २०१९ मधील ‘ठाकरे’ चित्रपटातील गाणे वाजले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.लाखोच्या संख्येने गोळा झालेले काही कार्यकर्ते भावूक होतांना दिसून येत होते.यापूर्वी,२००५ मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शेवटचे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले होते. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अविभाजित शिवसेना सोडल्यानंतर मालवण विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दोघेही उपस्थित होते.त्याच वर्षी राज ठाकरे यांनीही २७ नोव्हेंबर २००५ रोजी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि त्यानंतर २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाची स्थापना केली होती.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला गेला,तो परिसर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघात येतो.
- Advertisement -

