उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- रामटेक हा चर्चेचा लोकसभा मतदारसंघ ठरला आहे. कारण,याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यामुळे ऐनवेळी त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना मैदानात उतरावे लागले.पण,त्यांनी मिळालेल्या या संधीचे सोने केले आहे.श्यामकुमार बर्वे यांनी रामटेकचा गढ सर केला आहे.
बर्वे यांच्याविरोधात काँग्रेसचे आमदार राहिलेले पण, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेले राजू पारवे यांना उमेदवारी मिळाली होती.पण,त्यांना मतदारांनी नाकारले आहे.जवळपास ५० हजार मतांनी बर्वे यांनी पारवेंचा पराभव केला आहे.
रामटेक हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला मतदारसंघ.याठिकाणी काँग्रेस आणि भाजपकडून हिंदू दलित उमेदवाराला तिकीट देण्यात आले होते. त्यामुळे रामटेकमधील १६ ते १८ टक्के लोकसंख्या असलेल्या बौद्ध समाजामध्ये याबाबत काहीशी नाराजी होती.रामटेक मतदारसंघामध्ये लढत काँग्रेस विरुद्ध शिदेंची शिवसेना अशी असली तरीही खरी लढत आमदार सुनील केदार विरुद्ध भाजप अशीच असल्याचे दिसून येत होते.
रामटेकमध्ये विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ येतात.यात काटोलमध्ये शरद पवार गटाचे अनिल देशमुख,सावनेरमध्ये काँग्रेसचे सुनील केदार, उमरेडमध्ये राजू पारवे,कामठीमध्ये भाजपचे टेकचंद सावरकर,हिंगणामध्ये भाजपचे समीर मेघे आणि रामटेकमधून अपक्ष आशिष जयस्वाल हे आमदार आहेत.राजू पारवे हे भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक होते; पण कवेळी त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला अन् सोबत लोकसभेचे तिकीट देखील देण्यात आले.
शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांना यावेळी तिकीट कापण्यात आले.खरे म्हणजे त्यांनी बंडखोरीवेळी शिंदेची साथ दिली; पण त्याचे फळ त्यांना काही मिळाले नाही.त्यामुळे त्यांच्यात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती अशी चर्चा होत होती.राजू पारवे यांची उमरेडबाहेर फारशी ओळख नव्हती.तरी त्यांच्यामागे भाजपने संघटनात्मक शक्ती भक्कमपणे उभी होती.दुसरीकडे,बर्वे यांच्यामागे सुनील केदार यांनी ताकद उभी केली होती.त्यामुळे या मतदारसंघातील विजयाकडे राज्याचे खास करुन विदर्भाचे लक्ष लागले होते.

