उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीच्या लढतीत अखेर महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे.काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांनी भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचा दारुण पराभव केला आहे.विद्यमान खासदारांचा पराभव झाल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.विशेष म्हणजे १० वर्षानंतर काँग्रेसने हा मतदारसंघ पुन्हा एकदा काबीज केला आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते.महायुतीचे अशोक नेते,महाविकास आघाडीचे डॉ.नामदेव किरसान,बसपाचे योगेश गोन्नाडे,वंचित बहुजन आघाडीचे मडावी यांच्यासह एकूण ११ उमेदवार रिंगणात होते. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.सुरुवातीपासूनच अशोक नेते आणि डॉ.नामदेव किरसान यांच्यामध्येच अटीतटीची लढत होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.
मतमोजणीच्या पहिल्या राऊंड पासून ते सव्वीसव्या राऊंड पर्यंत डॉ.नामदेव किरसान यांनी विजयाची आघाडी घेतली.ही आघाडी अखेरपर्यंत कायम होती.मतमोजणीअंती काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान यांचा विजय निश्चित झाला.यामध्ये डॉ.नामदेव किरसान हे १ लाख ४० हजार २३४ मतांनी विजयी झाले.
कृषी महाविद्यालयाच्या मतमोजणी परिसरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. जसजशी त्यांच्या उमेदवारांना आघाडी मिळत होती तसा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान यांचा विजय निश्चित असल्याचे दिसताच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.तब्बल १० वर्षानंतर या मतदारसंघावर काँग्रेसने झेंडा फडकवल्याने काँग्रेसमध्ये नव्याने उभारी मिळाली आहे.

