- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारे डॉ.माधव गाडगीळ व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ म्हणून सदैव स्मरणात राहतील,अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मभूषण डॉ.माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ,पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष,नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ.माधव गाडगीळ यांचे काल बुधवारी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे रात्री ११ वाजता वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. डॉ.गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण,जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज,अभ्यासू मार्गदर्शक आणि संवेदनशील शास्त्रज्ञ देशाने गमावला आहे.प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस शोकसंदेशात म्हणाले की,डॉ.गाडगीळ यांनी पर्यावरणविषयक जाणिव जागृती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केलेत.पश्चिम घाटांमधील जैवविविधतेबाबतच्या संवेदना जिवंत ठेवणं आणि त्या प्रगल्भ करणे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.डॉ.गाडगीळ यांच्या योगदानाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने त्यांना २०२४ मध्ये यूएनईपीच्या ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित केले होते.सहा दशकांच्या वैज्ञानिक कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली.मात्र,त्यांनी स्वतला ‘जनतेचा वैज्ञानिक’च मानलं.पर्यावरण क्षेत्रातील कार्याने महाराष्ट्र सुपुत्र डॉ.गाडगीळ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली.या अर्थाने त्यांची पर्यावरण जतन,संवर्धन क्षेत्राला उणीव भासत राहील. त्यांच्या निधनामुळे एका ऋषीतुल्य मार्गदर्शकाला आपण मुकलो असून गाडगीळ कुटुंबीयांवर दुःखाचा आघात झाला आहे.त्यांच्यासह गाडगीळ यांचे चाहते,त्यांचे संशोधक विद्यार्थी यांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
(साभार-मुख्यमंत्री सचिवालय(जनसंपर्क कक्ष)मुंबई.)
- Advertisement -

