- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत आयोजित “विकसित महाराष्ट्र २०४७ युवा व क्रीडा संवाद,नागपूर” हा भव्य कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे पार पडला.या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे,क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे,आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, क्रीडा उपसंचालक पल्लवी धातक तसेच क्रीडा विभागातील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते.त्याचप्रमाणे नागपूर विभागातील जिल्हा,राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू,प्रशिक्षक,क्रीडा पदाधिकारी,क्रीडा क्षेत्रातील मान्यवर,तसेच जिल्हा युवा पुरस्कार्थी व युवक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.प्रसंगी मंत्री कोकाटे यांनी थेट युवकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या.गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्कार्थी सूरज चौधरी यांनी आपले मुद्दे मांडताना म्हटले की, ‘गाव तिथे ग्राउंड’ ही योजना तातडीने राबवावी,शाळा व महाविद्यालयांमध्ये तथा जिल्हा राज्य स्तरावर युवकांसाठी क्रीडा समुपदेशन केंद्र सुरू करावे, मोबाईलपासून दूर ठेवून मुलांचा कल मैदानाकडे वळविण्यासाठी मोबाईलकडून मैदानाकडे असे विशेष उपक्रम राबवावे,तसेच योगाभ्यास कडे विशेष लक्ष द्यावे,शाळा तिथे क्रीडा शिक्षक अशा महत्त्वाच्या सूचना मांडल्या.सदर सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत क्रीडा मंत्री कोकाटे यांनी ‘गाव तिथे ग्राउंड’ संदर्भात शासन निर्णय लवकरच काढण्याचे आश्वासन दिले.इतरही बाबींना नवीन धोरणात लागू करण्याचे ते बोलले.या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली भास्कर घटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतांना जिल्हा युवा पुरस्कार्थी सूरज चौधरी,रविंद्र बंडावार,राहुल वैरागडे,रश्मी वाळके, राष्ट्रीय धनुर्धर जय ठेम्बले,संघटक स्कॅश खेळाचे प्रमुख सरोजित मंडल,आदींनी सहभाग नोंदविला होता.
- Advertisement -

