- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- “हरित महाराष्ट्र,समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या,मंगळवार २२ जुलै रोजी करण्यात येणार आहे.
गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी २ वाजता आयोजित कार्यक्रमाला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल,आमदार सुधाकर अडबाले,आमदार डॉ.अभिजीत वंजारी, आमदार धर्मरावबाबा आत्राम,आमदार डॉ.मिलींद नरोटे,आमदार रामदास मसराम तसेच अप्पर मुख्य संचिव(वने) तथा जिल्ह्याचे पालक सचिव मिलींद म्हैसकर उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व मुख्य वनसंरक्षक रमेशकुमार यांनी कळविले आहे.तत्पूर्वी उद्याच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस यांचा आज,सोमवार २१ जुलै रोजी गडचिरोलीत आगमन होत आहे.अश्यातच उद्याच्या
कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज सोमवारी कार्यक्रमस्थळी भेट देत संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी २ वाजता वृक्ष लागवड पंधरवाड्याचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यावेळी “हरित महाराष्ट्र” मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात तब्बल ४० लाख वृक्ष लावण्यात येणार असून,हे अभियान जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारे ठरणार आहे.कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी पंडा यांनी आज स्थलपरीक्षण केले.यावेळी कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या बैठकीच्या,मांडव व व्यासपीठाच्या व्यवस्थेची पाहणी करून कार्यक्रमाची सुसूत्रता आणि यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या पाहणीवेळी अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे,अप्पर पोलीस अधीक्षक गोकूल,उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) स्मिता बेलपत्रे,एनआयसीचे संजय त्रिपाठी तसेच अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
- Advertisement -

