उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
कोंढाळा(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे दिनांक-७ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत सभागृहात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे; व सदर विशेष ग्रामसभेत शासनाकडील प्राप्त पत्राचे वाचन करणे, मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करणे, रमाई आवास योजना अंतर्गत प्रस्ताव सादर करणे,शबरी आवास योजना अंतर्गत प्रस्ताव सादर करणे तसेच विविध शासकिय योजने अंतर्गत कामाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती गावामध्ये दोन दिवसांपूर्वी वाऱ्यासारखी पसरली होती.सदरची माहिती वाऱ्यासारखी पसरताच ग्रामपंचायत सभागृहात आज,शुक्रवार दिनांक-७ जून रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घरकुलासाठी गावकऱ्यांची तोबा गर्दी उसळल्याने पदाधिकाऱ्यांची काही काळ चांगलीच तारांबळ उडाली होती.
ग्रामसभेला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ व ७३ व्या घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे.त्यामुळे ग्रामसभा ही केवळ घरकुल लाभार्थ्यांसाठीच नसून अनेक महत्वाच्या विषयांवर आधारित आहे.मात्र,सध्याच्या काळात घरकुलांसाठी ग्रामसभा आयोजित केल्यास गावातील युवक,महिला, पुरुष व हुलकावणी देणारे,चिथावणीखोर वक्तव्य करणारे,सर्वप्रथम ग्रामसभेस उपस्थित होतांना दिसून येतात.बसायला जागा मिळेनासी होते.मात्र,इतर ग्रामसभा आयोजित केल्यास ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे होऊन तहकूब ग्रामसभा अनेकवेळा घ्याव्या लागत असल्याचे चित्र हल्ली सगळीकडेच दिसून येत आहे.सर्वप्रथम ग्रामसभा म्हणजे काय? हे अनेकांना अजूनही कळलेले नाही.केवळ आवाज काढून बोलबाला करण्यात काहीही अर्थ उरत नाही.त्यामुळे आपल्या अधिकाराची जाण ठेऊन, केवळ घरकुल योजना बाबत ग्रामसभा असल्यासच न येता इतरही ग्रामसभेस सर्वांनी उपस्थिती दर्शविणे आवश्यक आहे.

