- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मराठी भाषेचे संवर्धन,स्थानिक बोलीभाषांचे जतन-संवर्धन,संशोधन आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘मराठी भाषा विकास व संशोधन केंद्र’ उभारण्यात येईल,अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी केली. तसेच गडचिरोलीसह पूर्व विदर्भाच्या समृद्ध झाडीबोली साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या झाडीबोली संमेलनासाठी मराठी भाषा विभागामार्फत दरवर्षी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मराठी भाषा विभागाचा आढावा तसेच जिल्ह्यातील साहित्यिक,कवी,लेखक,नाट्यकर्मी आणि बोलीभाषा अभ्यासकांसोबत आयोजित संवाद कार्यक्रमात मंत्री डॉ.सामंत बोलत होते.
यावेळी पद्मश्री डॉ.परशुराम खुणे,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव तथा राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रमेश तसेच सचिन सुपेकर,वासुदेव पोतदार,कुसुमताई आलाम,सदानंद बोरकर,प्रा. सिद्धार्थ डोंगरे,प्रा.युवराज प्रधान यांच्यासह जिल्ह्यातील विविध मराठी व बोलीभाषांतील साहित्यिक,लेखक,कलावंत आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी भाषा विभाग👇
साहित्यिक,लेखक आणि कलावंतांच्या प्रश्नांना जिल्हास्तरावर तत्पर प्रतिसाद मिळावा तसेच मराठी भाषा विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविता याव्यात,यासाठी पुढील महिन्यापासून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी भाषा विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ.सामंत यांनी सांगितले.या विभागासाठी स्वतंत्र मराठी भाषा अधिकारी आणि आवश्यक कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देण्यात येईल.त्यामुळे साहित्यिकांना आपल्या प्रश्नांसाठी आणि विविध योजनांच्या लाभासाठी थेट जिल्हास्तरावर यंत्रणा उपलब्ध होईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
- झाडीबोलीसह स्थानिक बोलीभाषांच्या साहित्याला शासनाचे पाठबळ👇
झाडीबोली तसेच राज्यातील विविध स्थानिक बोलीभाषांमध्ये निर्माण होणाऱ्या साहित्याला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा विभाग पुढाकार घेणार असल्याचे डॉ.सामंत यांनी सांगितले.बोलीभाषांतील शब्दसंपदा जतन करण्यासाठी व्यापक बोलीभाषा शब्दकोश तयार करण्याचे काम शासनाने हाती घेतले असून ते कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
- स्थानिक साहित्याचा विविध भाषांमध्ये अनुवाद👇
ग्रामीण आणि स्थानिक साहित्यिकांचे दर्जेदार साहित्य महाराष्ट्राबाहेर तसेच देश-विदेशातील वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनुवादाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.यासाठी स्व.यशवंतराव चव्हाण अनुवाद समितीच्या माध्यमातून मराठीतील निवडक साहित्याचा हिंदी,इंग्रजी,कन्नड,जपानी तसेच अन्य भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. या अनुवादासाठी लागणारा आर्थिक भार शासनामार्फत उचलण्यात येईल,असे डॉ.सामंत यांनी सांगितले.
- कलावंत संकुल व शासकीय नाट्यगृहासाठी सकारात्मक कार्यवाही👇
गडचिरोली जिल्ह्यातील समृद्ध झाडीपट्टी नाट्यपरंपरा आणि स्थानिक कलावंतांची संख्या लक्षात घेता त्यांना नाटकांच्या तालमी,साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कलाविषयक उपक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.त्यानुसार जिल्ह्यात कलावंत संकुल तसेच शासकीय नाट्यगृह उभारण्याच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल,असे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.
- झाडीपट्टी नाट्यपरंपरा,माडिया-गोंडी भाषांच्या संवर्धनाची मागणी👇
संवाद कार्यक्रमात जिल्ह्यातील साहित्यिक,लेखक आणि कलावंतांनी विविध सूचना व मागण्या मंत्री डॉ. सामंत यांच्यासमोर मांडल्या.पद्मश्री डॉ.परशुराम खुणे आणि सदानंद बोरकर यांनी झाडीपट्टीतील समृद्ध नाट्यपरंपरेचा उल्लेख करत स्थानिक कलावंतांना अधिक प्रोत्साहन,पुरस्कार आणि मानधनाच्या माध्यमातून शासनाचे पाठबळ मिळावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.
कुसुमताई आलाम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील माडिया,गोंडी यांसारख्या आदिवासी बोलीभाषांचे जतन आणि मराठी भाषेशी त्यांचा समन्वय साधण्यासाठी बहुभाषिक संशोधन केंद्राची आवश्यकता व्यक्त केली.प्रा.युवराज प्रधान व अन्य साहित्यिकांनी स्थानिक लोककला,दंडार,खडीगंमत आणि झाडीबोली साहित्याचे डिजिटल संग्रहण (डिजिटल आर्काइव्ह)करण्यासोबतच बोलीभाषांच्या सखोल अभ्यासासाठी संशोधन फेलोशिप सुरू करण्याची सूचना केली.
- माडिया-गोंडी भाषांच्या संवर्धनासाठी ‘एआय’चा वापर -जिल्हाधिकारी पंडा👇
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण भाषिक आणि सांस्कृतिक वारशाची माहिती दिली.माडिया व गोंडी भाषांचे संवर्धन करण्यासोबतच त्यांच्या व्याकरणाची संरचना विकसित करणे आणि भाषेचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गडचिरोली जिल्ह्याचा भाषिक,साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा अत्यंत समृद्ध आहे.झाडीबोली, माडिया,गोंडी आणि अन्य स्थानिक भाषांमधील साहित्य व लोकसंस्कृतीचे जतन करून हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.त्यासाठी राज्य शासन साहित्यिक,लेखक,संशोधक आणि कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आवश्यक संस्थात्मक आणि आर्थिक पाठबळ देईल,अशी ग्वाही मंत्री डॉ.उदय सामंत यांनी दिली.
- Advertisement -

