उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-लाडकी बहीण योजनेसाठी दाखला मागायला आलेल्या युवकाच्या सरपंचांनी कानशिलात लगावली,असा कांगावा केला जात आहे.मात्र,याचा काही एक संबंध नसून प्रकरण वेगळेच आहे.संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या गैरव्यवहाराची तक्रार केली म्हणून सूड उगवण्याच्या भावनेतून एका युवकाने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन आदिवासी महिला सरपंचाचा अपमान करून धमकी दिली.हे माझ्या मानसिकतेला न पटल्यामुळे मी एक झापड मारल्याची कबुली नवेगावबांधच्या सरपंचा हिराबाई पंधरे यांनी काल,मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
४ जुलै रोजी मी ग्रामपंचायत कार्यालयात लोकांच्या दाखल्यावर सह्या करत होते.आशिष लंजे हा युवक माझ्या कक्षात आला.माझे मजुरीचे पैसे दिले नाही, असे बोलला.वन व्यवस्थापन समितीकडे हिशेब सादर करा व समितीच्या सचिवांकडून पैसे मागून घ्या,असे मी सांगितले.यावर आशिष लंजे याने अपमानित करणाऱ्या भाषेचा उल्लेख करत धमकी दिली.मी प्रकृती योग्य नसल्याने प्रत्युत्तर दिले नाही.पूर्वीच्या वन व्यवस्थापन समितीच्या सभेत आशिषने सुमारे १३ लाख ५० हजार रुपयांचा खर्च मंजुरीसाठी सादर केला होता.हा खर्च शासकीय नियमानुसार नसल्याने या खर्चाला सभेत मंजुरी मिळाली नाही.अनियमिततेच्या कारणावरून आशिषला कामावरून काढून टाकण्यात आले.त्यानंतर हिल टॉप गार्डनमधील पाइपलाइन व इतर साहित्याची तोडफोड करण्यात आली होती. याचा आक्षेप आशिषवर असल्याची नवेगावबांधच्या पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली होती; अशी माहिती सरपंचांनी दिली.
त्यादिवशी आशिष हा लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा दाखला मागायला आला असल्याचे सांगत असला तरी तो खोटे बोलत आहे.तो आई-वडिलांना एकच मुलगा आहे.त्यामुळे त्याचा या योजनेशी काहीच संबंध नसल्याची माहिती सरपंचांनी दिली. यावेळी ग्रा.पं.सदस्य सोनाली नाकाडे व दुर्गा शहारे उपस्थित होत्या.
वन व्यवस्थापन समितीच्या कामावरून काढल्याने नवेगावबांधच्या स्थानिक स्तरावर समाजमाध्यमांमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपवर माझी व माझ्या पतीच्या नावाने बदनामीकारक मजकूर पाठवला.धमक्या दिल्या. यामुळेच मी अस्वस्थ होते.ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये बसून असलेल्या आशिषने हातवारे करत पाहून घेण्याचा बोटांद्वारे इशारा केला.त्यावेळी माझा राग अनावर झाला व मी त्याच्या कानशिलात लगावल्याची कबुली सरपंचा हिराबाई पंधरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

