उद्रेक न्युज वृत्त
छत्रपती संभाजीनगर :– मराठवाड्यात यंदा दुष्काळाच्या मोठ्या झळा जाणवू लागल्या असून गुरा-ढोरांपासून ते जीवापाड जपलेल्या पिकांपर्यंत, सगळ्यांचीच काळजी घेताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागते.पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना तो वाया जाऊ नये; यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत.अशातच जर एखाद्याकडे शेतीसाठी मुबलक पाणी असेल तर? मग ते पाणी हे एखाद्या संपत्तीप्रमाणे असून इतरांचाही त्याच्यावर डोळा असू शकतो; प्रसंगी ते पाणी चोरीही केले जाऊ शकते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये बोदवड या गावात शेतकऱ्यानी त्याचे पाणी चोरी जाऊ नये म्हणून भन्नाट आयडिया लावली आहे.मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आपल्या शेततळ्यातील पाणी चोरीला जाऊ नये आणि आलेली मिरचे जंगली प्राणी नुकसान करू नये म्हणून या शेतकऱ्याने आपल्या शेतावर ३६० डिग्रीचा कॅमेरा लावला आहे.मराठवाड्यात एकीकडे भीषण पाणीटंचाई आहे.तर दुसरीकडे या शेतकऱ्याने पाण्याची योग्य पद्धतीने काटकसर करून आणि नियोजन करून अडीच एकर क्षेत्रावर मिरचीचे पीक यशस्वी करून मिरची विकायला सुरुवात केली आहे.
सध्याच्या घडीला मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी हे सर्वात महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्याची सुरक्षा करण्यासाठी शेतात कॅमेरा बसवण्यात आला आहे.रामेश्वर गव्हाणे असे या शेतकऱ्याचे नाव असून तो सिल्लोड तालुक्यातील बोधवड गावचा रहिवासी आहे. शेतकरी म्हणाला की, “या वर्षी पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाला.त्यामुळे पाण्याचे नियोजन चोख पद्धतीने करावे लागले.हा कॅमेरा सिक्युरिटी म्हणून काम करतो.घरी बसून शेताकडे लक्ष देता येते.शेतात जर कुणी आलेच तर हा कॅमेरा त्याचे स्क्रीनशॉट काढून पाठवतो.तसेच मिरचीचे शेत असल्याने जर जंगली प्राणी शेतात घुसलेच तर त्याची माहितीही लगेच मिळते.”

