- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तावशी संभाजीनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका नर चितळाचा मृत्यू झाला.ही घटना रविवार १३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.४ ते ५ वर्षे वयाचा नर चितळ महामार्ग ओलांडत असतांना भरधाव वाहनाची धडक बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या धडकेत चितळाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.वनविभागाच्या अर्जुनी-मोरगाव येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून नियमानुसार पुढील वनवैधानिक कार्यवाही सुरू केली.
दुसऱ्या घटनेत आमगाव तालुक्यातील पाऊरदौना शेतशिवारात शेतातील तारेच्या कुंपणात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवार १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली.मृत बिबट्याचे वय सुमारे १६ महिने असून तारेच्या कुंपणात फसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.मात्र, मानवी हस्तक्षेप वा घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याने वनविभागाकडून प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेत पाहणी करून पंचनामा केला.मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असून शवविच्छेदन अहवाल तसेच चौकशीतील निष्कर्षानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.दोन्ही घटनांमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शेतकऱ्यांनी शेतातील तारेचे कुंपण करताना वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे.त्यातच,वनक्षेत्रालगतच्या मार्गांवर तसेच महामार्गावर वन्यप्राणी रस्ता ओलांडताना दिसून येतात. त्यामुळे अशा संवेदनशील मार्गावर वेगमर्यादा लागू करणे, वन्यप्राणी मार्गाचे फलक लावणे,सावधानतेच्या सूचना देणे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे.
- Advertisement -

