- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली.विशेष म्हणजे,शहरातील एक-दोन शाळा नव्हे तर तब्बल १२ नामांकित शाळांना धमकीचा ई-मेल आला.शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा ई-मेल पाहिल्यानंतर तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.धमकीची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. नागपूरचे सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अलर्ट जारी केला व तपास यंत्रणा कामाला लागली.
अधिक माहिती अशी की,आज मंगळवारच्या सकाळी १० वाजता शहरातील सेंटर पॉईंट,दिल्ली पब्लिक स्कूल, केंद्रीय विद्यालयाच्या अजनी,काटोल,वायुसेना नगर येथील शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळांच्या अधिकृत संकेतस्थळावर एक अनोळखी ई-मेल प्राप्त झाला.त्यात शाळांमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली. मुख्याध्यापकांनी लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली.तसेच शिक्षकांनाही एकत्र बोलवून त्यांना माहिती देण्यात आली.विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती न देता शांतपणे सुरक्षित जागेवर,मैदानावर हलविण्यात आले. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यांच्या पथकाला अलर्ट देण्यात आला.पोलिसांची पथके त्वरित शाळांमध्ये दाखल झाली.धमकीच्या मेलची तात्काळ गंभीर दखल घेत सर्व शाळांमध्ये बॉम्ब शोध व नाशक पथकाला पाठविण्यात आले.पथकाने संपूर्ण परिसर खाली करत तपासणी सुरू केली.सोबतच पोलिसांनी बॉम्बचा नेमका ठिकाणा शोधण्यासाठी १२ वाजेच्या सुमारास श्वान पथकाला देखील पाचारण केले. शाळेत अचानक पोलिस आल्याने आणि सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त तैनात केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.ही बातमी मिळताच घाबरलेल्या अनेक पालकांनी आपल्या मुलांना सुखरूप घरी नेण्यासाठी शाळांकडे धाव घेतली.या प्रकरणाचा सविस्तर तपास केला असता,हे धमकीचे ई-मेल एका खालिस्तानी संघटनेच्या नावाने पाठवण्यात आले असल्याचे समोर आले आहे.या ई-मेलमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की,या शाळा विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार लादत आहेत आणि याच कारणामुळे संपूर्ण शाळा बॉम्बने उडवून देण्यात येतील. आतापर्यंत पोलिसांनी धमकी आलेल्या सर्व १२ खासगी आणि सरकारी शाळांची कसून तपासणी केली आहे. सुदैवाने या तपासणीत कोठेही बॉम्ब किंवा कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला.मात्र,परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.सदरचे पाठविण्यात आलेले ई-मेल मस्करी म्हणून पाठविण्यात आले की,दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पाठविण्यात आले,याचा कसून तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

