- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव टाऊन परिसरात गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी दोन सख्ख्या भावांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.निरंजन लक्ष्मण फिरके वय ४० वर्षे व योगेश लक्ष्मण फिरके वय ३७ वर्षे,रा.सावनेर,ता.सावनेर,जि. नागपूर अशी मृतक भावांची नावे आहेत.सदरची दुर्घटना नेमकी कशामुळे घडली,हे त्यावेळी स्पष्ट झालेले नसल्याने सावनेर पोलीस प्रशासनाकडून प्रत्यक्षदर्शी तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला होता. तपास सुरू असतांनाच प्रकरणाला नवे वळण आले. विशेष म्हणजे,मृतकांचा मोठा भाऊ धनंजय लक्ष्मण फिरके हा पत्नी व तीन मुलींसह तीन दिवसांपूर्वीच घर सोडून गेला होता आणि इकडे आर्थिक विवंचनेमुळे दोन भावांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेत जीवन संपविल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे.
आर्थिक प्रगतीचे स्वप्न उराशी बाळगत मोठा भाऊ धनंजय,मधला भाऊ निरंजन व लहान भाऊ योगेश या तिन्ही भावांनी विविध संस्थांमधील नोकऱ्या सोडून सावनेर येथे ‘गहना डेअरी’ नामक दुग्ध व्यवसाय सुरू केला होता.अश्यातच व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांनी विविध वित्तीय संस्था,बँका,सहकारी सोसायट्या,तसेच खासगी सावकारांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलले. मात्र,व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्जाची परतफेड वेळेत होऊ शकली नाही.मोठा भाऊ धनंजय यांच्यावर ६ फायनान्स कंपन्या,१३ सोसायट्या आणि १४ खासगी सावकारांचे मिळून तब्बल १ कोटी ६९ लाख १० हजार रुपये कर्ज होते.मधला भाऊ निरंजन यांच्यावर दोन फायनान्स कंपन्यांचे ३३ लाख रुपये,तर लहान भाऊ योगेश यांच्यावर २ फायनान्स कंपन्या आणि बँक ऑफ इंडिया शाखेचे मिळून ११ लाख रुपये कर्ज होते.अशा प्रकारे तिन्ही भावांवर मिळून २ कोटी १३ लाख १० हजार रुपयांचा आर्थिक कर्जाचा डोंगर उभा राहिला होता.कर्जाची परतफेड थांबल्यानंतर विविध संस्थांकडून सातत्याने वसुलीसाठी तगादा सुरू झाला. अनेकांनी नोटीस बजावली,तर काही ठिकाणी जप्तीची प्रक्रियाही सुरू होणार असल्याने तिघेही भाऊ मानसिक दडपणाखाली आले होते.या आर्थिक विवंचनेच्या काळात मोठा भाऊ धनंजय फिरके यांनी पत्नी हितेश्री यांच्यासमोर अत्यंत गंभीर विचार व्यक्त केले होते. मात्र,हितेश्री यांनी त्यांना त्यापासून परावृत्त केले.त्यानंतर दोघेही तीन मुलींना घेऊन घरातून बाहेर पडले.ते प्रथम रामटेक येथील चक्रधर स्वामी मंदिरात गेले आणि तेथे दोन दिवस मुक्काम केला.त्यानंतर आर्थिक मदतीच्या आशेने हितेश्री यांच्या मैत्रिणीकडे कारंजा लाड येथे गेले.याचदरम्यान निरंजन आणि योगेश यांच्याबाबतची दुर्दैवी घटना घडल्याची माहिती त्यांना मिळाली.त्यामुळे त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला.दरम्यान,पोलिसांनी धनंजय व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. चौकशीदरम्यान धनंजय यांनी पोलिसांसमोर ‘मला कर्जाचीच सर्वाधिक चिंता आहे,’ अशी व्यथा व्यक्त केल्याची माहिती समोर आली.चौकशीनंतर धनंजय व त्यांच्या कुटुंबीयांची माळेगाव येथे जाण्याची मानसिक तयारी नसल्याने त्यांचे साळे महेश गायधने त्यांना सोबत घेऊन रामटेक येथे गेले होते.या प्रकरणात पोलिस निरीक्षक ऋतुजा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप निंबाळकर,हेड कॉन्स्टेबल रोशन काळे,अंकुश मुळे आणि कोमल जुमडे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.वाढते कर्ज,वसुलीसाठीचा सातत्याचा तगादा आणि आर्थिक विवंचनेमुळे दोन भावांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेत जीवन संपवले. तब्बल २ कोटी १३ लाख १० हजार रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या फिरके कुटुंबावर क्षणात दुःख आणि दुर्दैवाचा डोंगर कोसळल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

