- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-कित्येकदा प्रशासनाच्या वतीने पुलावरून पाणी वाहत असतांना वाहने वा इतर साधनांद्वारे पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये,असे आवाहन करण्यात येते.मात्र,काहीजण त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचे जीव धोक्यात घालून पुल ओलांडण्याचा प्रयत्न करून सर्वकाही गमावून बसतात.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरात वास्तव्यास असणारे व हल्ली मुक्काम सातगाव,बुटीबोरी,नागपूर येथे राहणारे ४५ वर्षीय नंदवर्धन हरबा शेंडे हे नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत असतांना त्यांनी दुचाकी घेऊन पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला असता नदीच्या प्रवाहात वाहून गेले. नंदवर्धन शेंडे हे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते.दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदाच हिंगणा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.त्यामुळे तालुक्यातील वेणा नदीला पूर आला होता.अश्यातच नंदवर्धन शेंडे हे बुधवारच्या रात्री १० वाजेच्या सुमारास वडगाव गुजर येथील कोलगेट कंपनी लॉजिस्टिक पार्कमधून ड्यूटी संपल्यानंतर ते प्लॅटिना दुचाकीने घरी जात असतांना वडगाव गुजर गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असतांना त्यांनी दुचाकी घेऊन पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला.रात्रीची वेळ असल्याने पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने नदीच्या प्रवाहात वाहून गेले.त्यांची दुचाकी पुलावरून दिसत असल्याने दक्ष नागरिकांनी हिंगणा पोलिसांना याबाबत माहिती दिली.यानंतर ठाणेदार जितेंद्र बोबडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नाळे, हवालदार राजेश नारे,अनंता गोतमुकुलवार,संजीव तायडे,अनिल झाडे,प्रणीत बंड घटनास्थळी पोहोचले व शोध सुरू केला.सुरुवातीला दुचाकी बाहेर काढून शेंडे यांचा नदीपात्रात शोध घेतला असता काल गुरुवारी घटनास्थळापासून जवळपास १ किलोमिटर अंतरावर नदीच्या काठावर त्यांचा मृतदेह आढळला.शेंडे यांच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.त्यांना दोन मुली आहेत.मुलींचे पालन पोषण करण्यासाठी व शिक्षणाच्या दृष्टिकोनातून ते गाव सोडून सातगाव येथे वास्तव्यास होते.अशातच काळाने झडप घातली.
- Advertisement -

