- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त:-तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.मात्र,काम करणाऱ्यांना घराबाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही.वाढते तापमान बघता आरोग्य विभागाने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.यात शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हामध्ये जाण्याचे टाळावे आणि भरपूर पाणी प्यावे,असे आवाहन करण्यात आले आहे. तापमानामध्ये बरीच वाढ झालेली असून,उष्ण लाटेमुळे कामगार, शेतकरी,भिकारीवर्ग,रस्त्यावरील विक्रेते,वयोवृद्ध, बालके,स्त्रिया आदी संवेदनशील गटांवर प्रतिकूल परिणाम होऊन त्याचा आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गटातील व्यक्तींनी विशेषतः बांधकामांचे कार्य करणाऱ्या कामगारांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडणे टाळावे व जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.
शक्यतो १२ ते ४ दुपारच्या वेळेत काम बंद ठेवून बाहेर उन्हामध्ये जाण्याचे टाळावे.कामाच्या वेळा सकाळी व सायंकाळी ठेवाव्यात.उन्हामध्ये घराबाहेर जात असतांना किंवा काम करत असतांना डोके व कान झाकण्याकरिता पांढऱ्या रंगाचा सुती कपडा किंवा दुपट्ट्याचा वापर करावा.पाणी भरपूर प्यावे,तसेच दुपारच्या वेळेस ओआरएस,ताक,लिंबूपाणी, नारळपाणी,उसाचा रस इत्यादी द्रव्यांचे सेवन करावे.
कामाच्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी,संस्थेने कामगारांकरिता मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी, सावलीकरिता शेड उपलब्ध करून द्यावे व त्यांना दुपारच्या सत्रात विश्रांतीकरिता आवश्यक नियोजन करावे.कार्यालयामध्ये अभ्यागतांसाठी पिण्याचे पाणी व सावलीकरिता शेडची व्यवस्था करावी.प्रवास करतांना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.पातळ,सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत.थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतांना छत्री,टोपी, टॉवेल आणि इतर पारंपरिक साधनांचा वापर करावा.
उन्हात बाहेर जातांना शूज किवा चप्पल घालावी.सर्वांनी जीवाची काळजी घ्यावी; विशेष म्हणजे लहान मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- Advertisement -

