- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-पिंजऱ्यातील वाघाची डरकाळी ऐकली की समोरचा हादरून जातो.पण,वाघोबा अन् तोही झुंड घेऊन निघाल्यावर काय होईल,याचा थरारक अनुभव काही महिलांनी घेतला.कापूस वेचण्यासाठी काही महिला सकाळीच रस्त्याने निघालेल्या… काही अंतर पार करताच रस्त्याने डुलत-डुलत एकापाठोपाठ एक असे चार वाघ आले…. मग काय सर्वांचीच बोबडी वळली… काय करावे एकीलाही सुचेना..! सगळ्यांची आरडाओरड सुरू झाली… गोंधळाच्या आवाजाने वाघांनीही आपला मार्ग बदलला अन् वेचणीला निघालेल्या महिलांनीही मिळेल त्या रस्त्याने पळ काढला.भिवापूर तालुक्यातील बेसूर शेतशिवारात सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.त्यामुळे दिवसभर गाव व शेतशिवारात महिलांना एकाचवेळी चार वाघ दिसल्याची एकच चर्चा होती.
बेसूर येथील दौलतराव धोटे यांचे शेत चिखलापार नदीलगत अगदी मुख्य रस्त्यालगत आहे. काल,शुक्रवारी सकाळी ७-८ वाजताच्या सुमारास मुख्य रस्त्यावरून एकामागोमाग चार वाघ रस्ता ओलांडून दौलतराव धोटे (गुरुजी) यांच्या शेतात जातांना प्रवाशांना दिसले.सुभाष गिरडे यांचे शेत लगतच आहे.त्यांच्या शेतात कापूस वेचणाऱ्या महिलांना धोटे यांच्या शेतात चार वाघ दिसताच त्या भांबवून गेल्या.त्यांनी आरडाओरडा करीत पळ काढला.आवाजाने वाघांनी आपला मार्ग बदलवला आणि नदीकडे निघून गेले.चार वाघ असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात व परिसरात पसरली. एक वाघीण व तीन तिचे पिल्ले असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.वनविभागाचे कर्मचारी तिथे पोहोचले व परिसर पिंजून काढला.
ताडोबा,गोरेवाडा,पेंच,उमरेड-पवनी- कन्हांडला,बोर अशी अभयारण्ये वाघ,बिबट,अस्वल आदी वन्यप्राण्यांचे घर म्हणून ओळखले जातात आणि ही सर्व नागपूरला लागून असल्याने पर्यटकांचा ओढा कायम तिकडे असतोच.पर्यटकांसाठी हे वन्यप्राणी रंजन करत असले तरी स्थानिकांसाठी हेच वन्यप्राणी भयाण संकट ठरत असतात.विशेषतः शेतकऱ्यांना तर जीवन- मरणाचाच प्रश्न असतो.
- Advertisement -

