- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-साहेबांचा… भाऊंचा… दादांचा सगळ्यांचेच उमेदवारी अर्ज काल,मंगळवार दिनांक-२९ ऑक्टोंबरला शेवटच्या दिवशी दाखल झाले.अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस,त्यात तो अचूक भरला जावा,ही धाकधूक मनात ठेवत बहुतांश प्रमुख उमेदवारांनी अर्ज सादर केले. ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय..!’ असे मनोमन वाटणाऱ्या बऱ्याच इच्छुकांनीही गुडघ्याला बाशिंग बांधले. अनेकांना अर्ज दाखल करतानाही कार्यकर्ते जमा करण्यासाठी चार दिवस खूप मेहनत करावी लागली. हे कार्यकर्ते अर्ज दाखल झाल्यानंतर नेमके कुठे गेले, ते समजले नाही.प्रमुख उमेदवारांच्या पाठीशी हजारोत तर काही इच्छुकांच्या मागे चार-पाच कार्यकर्ते,अशीही स्थिती होती.त्यांना मतदान किती होईल,कुणाचे मिळेल,हा भाग वेगळा.अचूक ज्यांचे अर्ज असतील, त्यांचे ग्राह्य धरले जातील,चुकलेले बाद ठरतील.सध्या दिवाळीचा माहोल आहे.चार दिवस फटाके वाजतील, फराळाच्या निमित्ताने एकमेकांविषयी स्नेह व्यक्त होईल.नंतर लगेचच भाऊबीजेचा दुसरा दिवस अर्ज मागे घेण्याचा शेवटचा आहे.काही अर्ज मागे घेतीलही; पण मागे हटणाऱ्यांची संख्या तशी कमीच.भले आपण निवडून नाही येणार,हे ठाऊक असते.अनेकांना आपल्या मोहल्ल्यातीलही मते मिळणार नाहीत,हे माहीत असते.तरी हौस स्वस्थ बसू देत नाही.निदान प्रमुख पक्षात तरी या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी होणार नाही,असे वाटत होते; तीसुद्धा मोठ्या प्रमाणात झाली.राजकारणात कुणाचा ‘गेम’ कधी होईल,याची शक्यता वर्तविता येत नाही.अनेकांसोबत ते अचानक घडते.काहींना एकदा तिकीट कटूनही पुन्हा उमेदवारी बहाल केली जाते.आता ज्यांना अशाप्रकारे उमेदवारी परत दिली गेली,त्यांनी माजी आमदार म्हणून मतदारसंघात काय ‘दिवे’ लावले,हा भाग वेगळा.काही माजी आमदार तर माजी’ आहे; हेच मिरवत असतात.त्यातील काहींना पक्ष,निष्ठेशी काहीच घेणे-देणे नसते; पण निवडणूक आली की,नेत्याच्या सोबत राहून आपल्याला पुन्हा संधी मिळावी,ही अपेक्षा असते.ती संधी बरोबर हेरून ते यशस्वी होतात.आता जनताही हुशार झाली आहे.नवखा उमेदवार असो की माजी आमदार मैदानात असो,कोण किती कामाचा हे जनताच जाणून आहे.त्यामुळे निदान जनतेला तरी उमेदवारांनी ‘गृहीत’ धरून चालूच नये. कारण,काळ बदलला आहे.समीकरणे बदलत आहेत.तुम्ही योजना आणा की आणखी काही करा,बरोबर आपले ‘मत’ कुणाला द्यायचे हे मतदार जाणून आहेत.काल शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करताना प्रमुख उमेदवारांच्या मनातही एक धाकधूक आहेच.आता निवडणूक सोपी राहिलेली नाही; पण अनेक इच्छुकांना जे निवडून यायची सुतराम शक्यता नाही,काहींचे डिपॉझिट पण जप्त होईल हे माहिती असातानाही दम दाखवीत आहेत.काल अर्ज भरताना तरी आपण निदान माहोल केला… यानिमित्ताने ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ ही हौस तरी पूर्ण करून घेता आली.पुढचे कोण पाहिले.आता घोडामैदान दूर नाही.तीनच आठवडे आहेत. प्रचारतोफा सुरू होतील.राजकीय फटाके फुटतील, फटाके कुणाचे वाजतील,फटके कुणाला बसतील,हेही पुढील नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वीच कळेल.
- Advertisement -

