- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागातील काही अधिकारी,कर्मचाऱ्यांचे निलंबन करून विभागात मोठी धास्ती निर्माण केली.या पार्श्वभूमीवर,राज्यातील महसूल अधिकारी,कर्मचाऱ्यांचे विनाचौकशी होणाऱ्या निलंबनाच्या विरोधात तसेच प्रलंबित मागण्या संदर्भात येत्या,शुक्रवार १९ डिसेंबरपासून राज्यात समन्वय महासंघाने आंदोलनाचे हत्यार उपसून कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.यामध्ये राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधीमंडळात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली.मात्र,त्यांची कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही.विना चौकशी निलंबन करणे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे.या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करीत असल्याचे नमुद करण्यात आले आहे.या शिवाय महसूल अधिकाऱ्यांना गौण खनीज अवैध उत्खननामध्ये केवळ दंड आकारण्याचे अधिकार आहेत.मात्र,गौण खनीज वाहूतक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून त्यांना पकडणे,जमावाला तोंड देण्याचे काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे.वास्तविक हे काम पोलिस व उपप्रादेशीक परिवहन विभागाचे आहे.मात्र,त्यांच्याकडे याबाबत विचारणाही न करता केवळ महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून कारवाई केली जात असून सदर प्रकार अन्यायकारक आहे.दरम्यान, राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करणे, अपीलीय प्रकरणात संरक्षण देणे,पोलीस विभागाच्या धर्तीवर नायब तहसीलदार पदासाठी महसूल खात्यांतर्गत परिक्षा घेण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनात ४० हजार अधिकारी व कर्मचारी सहभागी होतील,असे राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर यांनी म्हटले आहे.त्यातच,आता यावर शासनाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु झाला असून समन्वय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात उद्या,गुरुवार १८ डिसेंबरला दुपारी एक वाजता चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे.यावर काय तोडगा निघणार याकडे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
- Advertisement -

