उद्रेक न्युज वृत्त :- केंद्र सरकारने नवीन ‘हिट अँड रन’ कायद्या; जरी आणला असेल तरीही यात सर्वसामान्य नागरिकांची गोची होत असल्याचा प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला आहे.कित्तेक गाडी चालक हा लखपती वा करोडपती नाही? सर्वसामान्य नागरिक तसेच गोर गरीब सर्वात जास्त चालक-वाहक म्हणून सध्याच्या घडीला तसेच पूर्वी सुध्दा काम करतांना दिसून येत आहेत.एखादा ड्रायव्हर इसम ७ लाख रुपये कुठून भरणार? सध्या आपल्या देशात सुमारे चाळीस लाख ट्रक आहेत.देशांतर्गत मालाची तब्बल ७० टक्के वाहतूक ही रस्त्यावरून होते.रस्त्यावरून होणारी बहुतांश वाहतूक ही जड आणि मध्यम भार वाहून नेणाऱ्या ट्रकच्या माध्यमातून होत असते.जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी ट्रकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि या संपामुळे वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.ट्रक संपामुळे दूध,भाजीपाला,फळे यांची आवक होणार नसल्याने त्याचा थेट परिणाम भावावर होणार आहे.त्याच वेळी,पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा थांबण्याची देखील शक्यता आहे; ज्यामुळे स्थानिक वाहतूक आणि सामान्य लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने गुन्हेगारी कायद्यांमध्ये मोठे बदल केल्याची घोषणा केली होती.त्यानुसार आधी लागू असणाऱ्या भारतीय दंड संहितेच्या जागी भारतीय न्याय संहिता हा नवीन कायदा आणण्यात आला होता.रस्ते अपघातांच्या तरतुदींबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की,”सदोष मनुष्यवधाच्या कायद्यामध्ये आम्ही दोन बदल केले आहेत.एक बदल हा आहे की जर एखादा व्यक्ती गाडी चालवत असेल आणि त्याच्या हातून चुकून एखादा अपघात घडला आणि चालकाने तिथेच थांबून जखमींची मदत केली तर अशा व्यक्तीला मिळणारी शिक्षा कमी करण्यात आली आहे.कारण,चालकाने जखमींना रुग्णलयात पोहोचवण्यासाठी १०८ वर कॉल करून रुग्णवाहिका बोलावली किंवा पोलिसांना सदरील अपघाताची माहिती दिली तर अशा प्रकारणांमध्ये हे स्पष्ट असते की त्याचा हत्या करण्याचा हेतू नसतो.पण एखाद्या वाहन चालकाने अपघात झाल्यानंतर जखमींना तिथेच सोडून,पोलीस किंवा दवाखान्यात अपघाताची माहिती न देता पळ काढला आणि पोलिसांनी अशा चालकाला अटक केली तर अशा हिट अँड रन प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद आम्ही या नवीन कायद्यात केलेली आहे.”नवीन कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणामध्ये रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि वाहनचालकाने तिथून पळ काढला तर चालकाला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.आधी अशा प्रकरणांमध्ये चालकाची ओळख पटल्यानंतर त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ (निष्काळजीपणे वाहन चालवणे),३०४A (निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे) आणि ३३८ (जीव धोक्यात घालणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात यायचा.यामध्ये दोन वर्षांच्या कारावासाची तरतूद होती.पण अनेक अपघातानंतर वाहनचालक पळून जात होते आणि काही दिवसांमध्येच आरोपी ट्रक चालकाला जामीन मिळत होता.
मात्र सध्याच्या घडीला १ जानेवारीपासून महाराष्ट्रात आणि देशभरात ट्रान्सपोर्ट युनियन (वाहतूक संघटना) यांच्याकडून संप पुकारण्यात आला आहे.कारण की,अपघात झाला आणि ड्रायव्हर तिथेच थांबला तर स्थानिक लोक त्याला मारून टाकतील आणि जर तिथून ड्रायव्हर निघून गेला तर नवीन कायद्यानुसार त्याला दहा वर्षांसाठी खडी फोडायला तुरूंगात जावे लागेल.आम्ही थांबलो तरी आमचे मरण आहे आणि नाही थांबलो तरी मरण आहे आणि म्हणूनच आम्ही या नवीन कायद्याचा विरोध करतोय.”असे अनेकांचे म्हणणे आहे.ट्रक चालकांसोबत,खाजगी बस चालक आणि इंधन वाहतूक करणारे टॅंकरचालकही या संपात सहभागी झाले आहेत. मुंबई,नाशिक,वर्धा,अमरावती, नंदुरबार,नागपूर,सोलापूर अशा अनेक ठिकाणी ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत.इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर मालकांनीही या संपत सहभाग घेतला आहे.रस्त्यावरची ट्रक वाहतूक थांबल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने सामान्य नागरिकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे.चालकांच्या या संपामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

