उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- शासन स्तरावरून पीक विमा भरण्याबाबत शेतकऱ्यांना एकप्रकारे भुरळच घातली जाते आहे.जेव्हा विमा भरून नुकसान होत असते; अशा वेळेस शेतकऱ्यांना भरपाईसाठी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात.त्यानंतर हताश होऊन मुर्दाड प्रशासनास जागे करावे लागते.असाच प्रकार नागपूर जिल्ह्याच्या काटोल-नरखेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांना २०२३-२४ मधील खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्याचा पहिला हप्ता मिळाला.मात्र, बहुसंख्य शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.यासाठी २० जूनला रितसर तक्रार करण्यात आली.परंतु उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी काहीच कार्यवाही केली नसल्याने काल, ‘जबाब दो यात्रा’ चे संयोजक सागर दुधाने यांच्या नेतृत्त्वात शेतकरी कार्यालयात धडकले. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलवर जिवंत कोंबडी,दारूच्या बॉटल्स,आंबे आणि चिल्लर पैसे ठेऊन ठिय्या आंदोलन केले.अशातच ‘तुम्ही काहीही खा अन् प्या’ पण विम्याची रक्कम द्या..! अशी भूमिका शेतकऱ्यांनी बजावली.
खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्याच्या पहिल्या हप्त्यापासून बहुसंख्य शेतकरी वंचित आहेत.अनेकदा निवेदन,तक्रारी करूनही ढिम्म प्रशासन हलत नसल्याने काल,कृषी उपविभागीय कार्यालयात सकाळी ११ वाजता शेतकरी धडकले.उपविभागीय कृषी अधिकारी चौधरी यांना बोलवा,त्याशिवाय आम्ही जाणार नाही; अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. उपविभागीय कृषी अधिकारी हे नागपूरला दौऱ्यात असल्याने ते कार्यालयात उपस्थित नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे उपविभागीय कृषी अधिकारी येईपर्यंत हलणार नाही; अशी आग्रही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.शेतकऱ्यांचा संताप बघता कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली.पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी,पीक विमा तालुका प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी काटोल-नरखेड यांची ३ जुलैला दुपारी १२ वाजता बैठक बोलविण्याचे लेखी पत्र मिळाल्यानंतर शेतकरी कार्यालयातून निघाले. जवळपास ५ तास शेतकरी कार्यालयात बसून होते. रोशन सातांगे,मनोहर भस्मे,गजानन भस्मे,विनायक पाटील,शालीक राऊत,प्रदीप धोटे,देवेंद्र ठाकरे आदी शेतकरी उपस्थित होते.

