उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- जन्मदात्या आईला घराचे सुख मिळावे यासाठी मुले जीवाचे रान करताना दिसून येतात.मात्र, समाजात काही कुपुत्र असेदेखील आहेत,जे केवळ आईच्या संपत्तीवर डोळा ठेवून असतात.नागपुरातील दोन घटनांतून ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे.
दोन्ही घटनांमध्ये मुलांनी स्वतःच्या आईच्या हक्काची मालमत्ता अक्षरशः ओरबाडून घेतली.एका प्रकरणात तर मुलाने रजिस्ट्रीच्या वेळी खोटी आईच उभी केली व खऱ्या आईला त्यामुळे वृद्धाश्रमात जावे लागले.
जरीपटका व मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत या दोन घटना घडल्या.पहिल्या घटनेत मीना मुरलीधर निपाने वय ७० वर्षे,हिंद स्वामी समर्थ संकुल, झिंगाबाई टाकळी ही दुर्दैवी माता आहे.मीना व त्यांचे पती मुरलीधर यांना अभिजित व अनिकेत अशी दोन मुले आहेत.अभिजितची वर्तणूक चांगली नसल्याने तो १४ वर्षांपासून वेगळा राहत होता तर अनिकेत गोव्याला राहतो.कोरोनात निपाने दाम्पत्य लहान मुलाकडे राहायला गेले.दरम्यानच्या काळात अभिजितने मीना यांच्या जागेवर खोटी महिला उभी करून त्यांचे गोरेवाडा येथील दोन भूखंड ६० लाखांना विकले.ही बाब मीना यांना कळाल्यावर त्या पतीसह नागपुरात परतल्या.मात्र,अभिजित त्यांना त्यांच्या घरात त्याच्या पत्नीसह दिसला.त्याने त्यांना घरात प्रवेश नाकारला व बाहेर काढले.मीना यांनी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली व त्या पतीसह वृद्धाश्रमात राहण्यासाठी गेल्या.दुय्यम निबंधक कार्यालयातून विक्रीपत्राची प्रत मिळविली असता भलत्याच महिलेचा फोटो असल्याची बाब समोर आली.
दुसऱ्या घटनेत निरक्षर आईचा अंगठा घेऊन मुलाने दुकान हस्तगत केल्याची बाब समोर आली आहे.या प्रकरणात आईने मुलाविरोधातच पोलिसांत तक्रार केली व पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
भोजंताबाई मारोतराव शेंडे वय ८० वर्षे,त्रिरत्ननगर असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्यांना पाच मुले व दोन मुली आहेत.त्यांच्या पतीने इंदोरा येथील मॉडेल टाऊनमधील दुकान विकत घेतले होते.त्याचे दोन भाग केले होते व एक भाग अनिल या मुलाला दिला होता तर एक भाग स्वतःकडेच ठेवला होता.२०२० साली त्यांचे निधन झाले.त्यानंतर मनोज व राजेश या मुलांनी दुकानावरील नाव मिटविले व कुलूप तोडून त्यावर कब्जा केला.भोजंताबाई यांनी विचारणा केली असता राजेशने ते दुकान त्यांच्या नावावर करून देण्याची प्रक्रिया करून देतो,अशी बतावणी केली.१५ जून २०२१ रोजी त्याने दुकान नावावर करून देण्याच्या नावाखाली त्यांचा स्टॅम्प पेपरवर अंगठा घेतला.मात्र, प्रत्यक्षात त्याने ते दुकान मनोज व स्वतःच्या नावे करून घेतले होते.ऑक्टोबर महिन्यात मनोजचा मृत्यू झाला व त्यानंतर राजेशने दुकान स्वतःच्या ताब्यात घेतले.आई निरक्षर असल्याचा फायदा घेत त्याने त्यांची फसवणूक केली.ही बाब समोर येताच भोजंताबाई यांनी जरीपटका पोलिस ठाण्यात मुलगा राजेशविरोधात तक्रार केली.

