- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ग्राहक तक्रार निवारण आयोगात ग्राहकांनी केलेल्या तक्रारी तसेच त्यांनी मांडलेल्या गाऱ्हाणी यांचे निराकरण करून निर्णय दिला जातो. आयोगात वकील करण्याची गरज नाही.एखादा ग्राहक सदोष वस्तू पुरवठा करणाऱ्या दुकानदाराची, बँकेची, विद्युत वितरण कंपनीची,मोबाईल कंपनी वा नानाविध विक्रेत्यांची तक्रार दाखल करून न्याय मिळवू शकतात. ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे (मंच)कार्यालय हे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा स्तरावर कार्यरत असून सुजाण ग्राहकांनी त्याबाबत माहिती घेऊन प्रकरण हाताळावे.नुकतेच काही दिवसांपूर्वीच यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र उल्हास मराठे यांनी सातारा येथील ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला शेतकऱ्यास सदोष मशिन पुरवठा करून ग्राहकाची फसवणूक आणि ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये आणि तक्रार खर्चाचे ५ हजार रुपये व कंपनीला मशिनसाठी दिलेले ८० हजार रुपये परत करून एकूण ९५ हजार रुपये द्यावे,असा आदेश पारित केलेला असतांनाच आता आणखी एका पत संस्थेच्या प्रकरणात आयोगाच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षाला काल सोमवारी अटक करून एक दिवसाकरिता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यवतमाळ शहरातील स्वामी समर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष रामप्रसाद वैद्य रा.यवतमाळ असे अटकेतील अध्यक्षाचे नाव असून पत संस्थेच्या अध्यक्षाने ग्राहक आयोगाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ केली व आयोगाने वारंवार नोटीस पाठवूनही प्रतिसाद दिला नसल्याने ग्राहक आयोगाच्या आदेशाने यवतमाळ शहर पोलिसांनी सदरची कारवाई केली.
प्रकरण असे की,यवतमाळ शहरात स्वामी समर्थ नामक पतसंस्था असून या पतसंस्थेत यवतमाळ शहराच्या रामनगर येथील उषा सुपारे यांनी लाखो रुपयांची रक्कम गुंतविली होती.मुदतीअंती त्यांना ५ लाख ९ हजार ९८७ रुपये पतसंस्थेकडून घेणे होते. यासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली.आयोगाने उषा सुपारे यांच्या बाजूने निर्णय दिला. पतसंस्थेने ५ लाख ९ हजार ९८७ रुपये ८ टक्के व्याजासह द्यावे,असा आदेश ३० जुन २०२२ रोजी दिला होता.आयोगाने आदेश देऊन बराच कालावधी लोटूनही पतसंस्थेकडून रक्कम दिली जात नसल्याने ग्राहक उषा सुपारे यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात कलम ७२ नुसार अवमानना(अवहेलना)प्रकरण दाखल केले. पतसंस्थेकडून दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने संस्थेचे अध्यक्ष रामप्रसाद वैद्य यांना आयोगाने वारंवार नोटीस बजावली.पण,रामप्रसाद यांनी त्याकडे कानाडोळा करून दुर्लक्ष केले.प्रकरणी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र उल्हास मराठे यांनी अजामीनपात्र वॉरंट काढला. यानुसार यवतमाळ शहर पोलिसांनी रामप्रसाद वैद्य यांच्या अटकेची कारवाई पूर्ण केली व त्यांना आज मंगळवारी आयोगासमोर हजर केले जाणार होते. विशेष म्हणजे,ग्राहक आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास तसेच दंडाची तरतूद आहे.त्यामुळे आयोगाने दिलेल्या निर्णयाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
- Advertisement -

