उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली:-मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे.प्रत्यक्षात रेल्वेचे काम संथगतीने सुरू आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने करावे व बंद असलेल्या रेल्वेगाड्या चालू करण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेत केली. कोरोनाकाळापासून बलारशहा-वडसा-गोंदिया मार्गावरील काही ट्रेन बंद आहेत.त्यामुळे या मार्गांवर आवागमन करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.तर दुसरीकडे सिरोंचा,अहेरी भागातील रस्ते खराब असल्याने व नागपूरचा प्रवास या मार्गाने लांब होत असल्याने या भागातील नागरिक काजीपेठ मार्गे,काजीपेठ अजनी पॅसेंजर ट्रेनने प्रवास करीत होते.मात्र,ती ट्रेनसुद्धा कोरोनाकाळात बंद केल्यापासून अद्याप सुरू केली नाही.अहेरी-सिरोंचा परिसरातील नागरिकांना आवागमनाकरिता त्रास होत असून,वडसा ते चांदा फोर्ट,चांदाफोर्ट ते गोंदिया,गोंदिया ते रायपूर,काजीपेठ ते अजनी (नागपूर) या गाड्या कोरोनाकाळापासून बंद आहेत. त्या गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात.गडचिरोली-वडसा,नागभीड-नागपूर रेल्वेचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे.वडसा आणि अन्य महत्वाच्या ठिकाणी जिथे रेल्वेच्या खाली भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत.तिथे तुडुंब पाणी भरत असल्याने लोकांना प्रवासाकरिता अडचण निर्माण होत आहे.अशा ठिकाणी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी खा.डॉ.नामदेव किरसान यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे केली आहे.

