- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-हरितक्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथे ‘शाश्वत शेती दिन’ कृषी विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. समाजकल्याण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला,तर कृषी तज्ज्ञांनी नैसर्गिक,सेंद्रिय व शाश्वत शेतीच्या विविध पद्धतींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शाश्वत शेतीविषयी सखोल विचार मांडले.कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर,कृषी उपसंचालक मधुगंधा जुलमे,कृषी विकास अधिकारी किरण खोमणे,जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी प्रदीप तुमसरे,कृषी तज्ज्ञ बोथीकर आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शाश्वत शेती म्हणजे पर्यावरणपूरक,खर्चिक इनपुटशिवाय अधिक उत्पादन देणारी शेती.याबाबत मार्गदर्शन करतांना तज्ज्ञांनी सेंद्रिय खतांचा वापर, पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन,पिकांची फेरपालट, कीडनियंत्रणाचे पर्यायी उपाय यासारख्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा यावरही सविस्तर चर्चा झाली.यावेळी जिल्ह्यात नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून यशस्वी कामगिरी करणाऱ्या काही प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.त्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या शेतकऱ्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी शाश्वत शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. पर्यावरण-संवेदनशील व टिकाऊ शेतीच्या माध्यमातूनच भावी पिढ्यांचे अन्नसुरक्षेचे स्वप्न साकार होईल,असे त्यांनी सांगितले.सदरचा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी,मार्गदर्शक आणि विचारप्रवर्तक ठरला.शाश्वत शेतीच्या दिशेने गडचिरोली जिल्ह्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी या उपक्रमामुळे नक्कीच दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
- Advertisement -

